मानोरी (जि. नगर) येथील शंकर आणि बाबासाहेब सपकाळ या दोघा अल्पभूधारक सपकाळ बंधूंनी प्रतिकूल परिस्थितीतून दोन गायींपासून ४० गायींपर्यंत दुग्धव्यवसाय विस्तारला आहे. दरवर्षी ते दोनशे टन मुरघास तयार करतात. स्वमालकीचे पुरेसे जमीन क्षेत्र नसतानाही मुरघासातून चाऱ्याबाबत स्वयंपूर्णता मिळवत प्रति दिन सुमारे २०० ते २२५ लिटरपर्यंत दूधसंकलनापर्यंत मजल मारली आहे. नगर जिल्ह्यात मानोरी (ता. राहुरी) येथील शंकर बन्सी सपकाळ व बंधू बाबासाहेब या दोघा भावंडांचे एकत्रित कुटुंब आहे. आर्थिक परिस्थिती पूर्वी हालाखीची होती. अवघे एक एकर स्वमालकीचे जमीन क्षेत्र. त्यामुळे आई-वडिलांनी मजुरी करुन कुटूंब सांभाळले. बारावीपुढचे शिक्षण घेण्याची शंकर यांची इच्छा होती. मात्र परिस्थितीमुळे उत्पन्न मिळवणे गरजेचे होते. दुग्धव्यवसायाचा निर्णय
सन २०१५ मध्ये वीस हजारांचे भांडवल उभे करून दोन संकरित (एचएफ) दुभत्या गाई खरेदी केल्या. त्यानंतर कालवडी सांभाळत टप्प्याटप्प्याने वाढ करत आज पंचवीस गायी व पंधरा कालवडी आहेत. स्वमालकीचे पुरेसे क्षेत्र नसतानाही अडचणींवर मात करत दुग्धव्यवसाय बऱ्यापैकी वाढवला. सन २०१५ मध्ये दहा लाख रुपये खर्च करून ११ गुंठ्यावर गायींसाठी मुक्त गोठा उभारला. सुरुवातीला केवळ प्रति दिन पंचवीस लिटर दूध संकलित व्हायचे. आता दररोज दोनशे ते सव्वादोनशे लिटर दूध संकलित होते. डेअरी केंद्रचालक घरी येऊन दूध घेऊन जातात. टॅक्ट्ररसह कुट्टी यंत्राची खरेदी
मुरघासासाठी उपयोगी ठरण्यासाठी चार वर्षांपूर्वी दहा लाख रुपये खर्च करुन ट्रॅक्टरसह कुट्टी यंत्र खरेदी केले आहे. अन्य शेतकऱ्यांनाही कुट्टी करुन देणे शक्य झाले आहे. त्यातून उत्पन्नाचा स्रोत तयार झाला आहे. गायींसाठी मुक्त गोठा केल्यापासून शेणखताला मागणी वाढली आहे. गोठ्यात गायी मुक्त संचार करतात. खताची उचल न करतात जागेवरच ते पडून दिले जाते. त्यामुळे अल्प काळात ते सुकते. त्याचे भुसभुशीत खत तयार होते. दर महिन्याला साधारण चार ट्रॉली ते उपलब्ध होते. राहुरी, राहाता, श्रीरामपूर, नेवासा भागात फळबागांचे क्षेत्र आहे. त्यासाठी शेतकरी जागेवरून ते घेऊन जातात. त्याला मागणीही चांगली आहे. प्रति ट्रॉली तीन हजार रुपये दराने महिन्याला साधारण बारा हजार रुपये उत्पन्न त्यातून मिळते. मानोरी येथील प्रगतिशील शेतकरी कृषिभूषण डाॅ. दत्तात्रय वने यांच्या पुढाकारातून गावातच शेतकरी गटाची स्थापना झाली. त्यानंतर गटाची संख्या वाढल्याने त्याचे शेतकरी उत्पादक कंपनीत रूपांतर झाले. सपकाळ देखील या गटात आहेत. या शेतकऱ्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सातत्याने वेगवेगळ्या योजनांमधून शेतकरी समृद्धीसाठी आधार दिला आहे. सपकाळ यांनाही त्याचा फायदा झाला आहे. कृषी विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या साह्याने मानोरी येथे पशुसंवर्धन मंच स्थापन केला आहे. त्याचे डाॅ. वने अध्यक्ष आहेत. सपकाळ परिवाराला त्याद्वारे दरवर्षी कोंबडीची ४५ पिल्ले, दोन गायींसाठी पाच गोण्या खाद्य, २५ किलो मिक्स मिनरल खाद्य व गवताची ६०० पर्यंत ठोंबे दिली जातात असे कृषी विद्यापीठाचे प्रसिद्धी प्रमुख सचीन सदाफळ यांनी सांगितले. मुरघासाचे पद्धतशीर व्यवस्थापन
एक एकरांपैकी ११ गुंठ्यात गायींसाठी मुक्त गोठा आहे. अर्ध्या एकरांत गवत तर उर्वरित जागा मूरघास निर्मितीसाठी वापरतात. घरच्या क्षेत्रावर पुरेसा चारा उत्पादित करणे शक्य नसल्याने विकतच्या चाऱ्यावर जनावरे जोपासली. सन २०१५ पासून मूरघास तयार करण्यास सुरुवात केली. त्यासाठी पावसाळ्यात मका खरेदी करण्यात येतो. दरवर्षी २०० टन मुरघास तयार होतो. त्यासाठी प्रति शंभर टन क्षमतेचे दोन हौद उभारले आहेत. सुमारे ४० जनावरांना वर्षभर तो पुरेसा होतो. मागील पाच वर्षांत दोन वेळा दुष्काळी समस्येला अनेक शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले. मात्र सपकाळ बंधूंनी आधीच वर्षभराचा चारा तयार करून ठेवला असल्याने दुष्काळावर मात करता आली. आमचे क्षेत्र अत्यंत कमी असल्याने दुग्धव्यवसाय चांगल्या प्रकारे करून उत्पन्न वाढीवर भर दिला. मुरघासातून चाऱ्याचा प्रश्न सुटला. दुष्काळी परिस्थितीवर मात करता आली. चिकाटीने व्यवसाय केला तर नक्कीच यशस्वी होतो. — शंकर बन्सी सपकाळ, ९८५०१३९०९४