बांबू उद्योगात भारताला स्वयंपूर्ण बनविण्याची क्षमता ः मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवर
सुधीर मुनगंटीवर

मुंबई: कागद, कागदाचा लगदा, वस्त्र या विविध उत्पादनांद्वारे बांबूच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करण्याची मोठी ताकद बांबू उद्योगात असून, हा उद्योग भारताला स्वयंपूर्ण बनवेल, असे प्रतिपादन वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी (ता. १९) केले.  बांबू गुंतवणूक परिषदेच्या उद्‍घाटनावेळी ते बोलत होते. ही परिषद महाराष्ट्र शासन आणि वन खाते, महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ, महाराष्ट्र वन विकास महामंडळ, बीएसई लिमिटेड आणि इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी (आयएफजीई) यांनी संयुक्तपणे आयोजित केली होती.  ‘‘चीनमधून भारतात तब्बल ३ हजार ५०० कोटी रुपये किमतीच्या १,६५,००० टन इतक्या अगरबत्तीसाठी लागणाऱ्या काड्या आयात केल्या जातात. इतकेच नाही तर दात कोरण्यासाठी लागणाऱ्या काड्या कोरियातून आयात केल्या जातात. त्या पार्श्वभूमीवर आयटीसीच्या मंगलदीप या ब्रॅंडच्या अगरबत्यांच्या काड्याच्या उत्पादनासाठी महिला बचत गटांना जोडण्याची पावले उचलण्यात येत असून, या माध्यमातून शेतकरी आणि महिलांचे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण होण्यास मदत होऊ शकेल,’’ असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. ‘‘मौल्यवान धातूप्रमाणेच बांबूला समांतर महत्त्व देण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना १० रुपयांमध्ये टिश्यू कल्चरचे नमुने देण्यात येतील, त्यात सरकारचा १५ रुपये सहभाग असेल. या माध्यमातून सहा वर्षांनंतर शेतकऱ्यांना चांगला परतावा यातून मिळण्यास मदत होऊ शकेल. संपत्ती निर्मितीसाठी भांडवली बाजारालादेखील या क्षेत्राकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाईल,’’ असेही मंत्री मुनगंटीवार या वेळी म्हणाले. बांबू लागवडीला प्रोत्साहन देतानाच त्याचा चिरस्थायी पुरवठा होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र वन विकास महामंडळ (मर्यादित) इथेनॉल, बायो सीएनजी उत्पादन यांसारख्या औद्योगिक वापरासाठी बांबूच्या जैविक इंधनाचा (बायोमास) पुरवठा करण्याच्या दृष्टीने ट्रंकी कंवा शेअररिंग आधारावर बांबू लागवडीसाठी टीश्यू कल्चरचा उपयोग करण्याचा विचार करीत आहे. व्यावसायिक लागवड प्रकल्पासाठी किमान २५ एकर जागा असलेले इच्छुक शेतकरी किंवा अन्य जणांसाठी महाराष्ट्र वन विकास महामंडळाने सेवा पुरवठादार म्हणून मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. वन विभागाचे प्रधान सचिव विकास खर्गे म्हणाले, की चीनची वर्षाला २९ अब्ज डॉलर्सची बांबू उद्योगातील उलाढाल आहे. चीनच्या बांबू उद्योगाला भारतीय बांबू उद्योगाकडून आव्हान देणे शक्य आहे. बांबू उद्योगाला चालना देण्याची गरज असून सध्या त्रिपुरा राज्यात या क्षेत्रात कुशल मनुष्यबळ घडविण्याच्या दृष्टीने केवळ ४५ दिवसांचा अभ्यासक्रम राबविण्यात येतो. त्यासाठी आता चंद्रपूरमधील बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्रात राज्य सरकारने दोन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रम सुरू केला असल्याची माहिती खर्गे यांनी या वेळी दिली. इंडिया फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जीचे अध्यक्ष एम. के. पाटील म्हणाले, की बांबू मोहिमेचे पुनरुज्जीवन करतानाच भारतीय वन कायद्यात सुधारणा करून धोरणात्मक बदल घडवून आणण्यात मोठी भूमिका बजावण्यात आली असून, देशातील बांबू क्षेत्राच्या विकास आणि प्रसारासाठी हा बदल ‘गेम चेंजर’ ठरू शकतो. लागवडीचा विचार करता सुमारे ८५ दशलक्ष वापरात नसलेल्या जागेचा विकास बांबूसाठी करता येऊ शकेल आणि पर्यायाने हरितकरणाला चालना मिळण्यास मदत होऊ शकेल. बांबूला मोठी मागणी अभियांत्रिकी, वास्तू रचना, बांधकाम, रेयॉन वस्त्र निर्मिती, कागद उत्पादन, हस्तकला, खाद्य, औषध आदी विविध क्षेत्रांत बांबूचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असून, त्याला महत्त्वपूर्ण असे पर्यावरण मूल्य आहे. बांबू प्रक्रियेमध्ये अलीकडे झालेल्या संशोधनानंतर बायो सीएनजी, २ जी इथेनॉल, ऊर्जानिर्मिती, लॅमिनेटेड फर्निचर, पॅनल्स, कोरुगेटेड शिट्स, विणलेली बांबू उत्पादने आदी विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांबूचा वापर केला जातो. देशात २०१७ या वर्षामध्ये चीन, इटली, मलेशिया, जर्मनी आणि अमेरिका हे सर्वांत मोठे बांबू निर्यातदार देशांसह ७४ देशांमधून एकूण १५४.९८ दशलक्ष डॉलर्स किमतीच्या बांबूची आयात करण्यात आली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com