कोल्हापूर : कारखानदार व शेतकरी संघटनांमध्ये ऊस दर प्रश्नी तोडगा निघाल्यानंतर सप्ताहाच्या आतच जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी पहिला हप्ता विनाकपात ३००० रुपये इतका जाहीर केला.
बैठकीत एफआरपी अधिक १०० रुपये पहिला हप्ता व दोन महिन्यांनंतर शंभर रुपये कारखान्यांनी द्यावेत, असा समझोता झाला होता. पण अनेक कारखान्यांनी ‘एफअारपी’बरोबरच २०० रुपयेच एकाच वेळी दिले आहेत. यामुळे बैठकीत शंभर रुपये नंतर देण्याचे ठरूनही कारखान्यांनी ही रक्कम एकत्रच दिली आहे. कारखान्यांकडे पैसे द्यायची तयारी होती तर हप्ता जाहीर करायला टाळाटाळ का केली, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
जिल्ह्यातील साखर उतारा सरासरी ११ ते १३ एवढा अाहे. साखर उताऱ्यानुसार २७०० ते २९०० रुपयांपर्यंत एफआरपी दिली जाते. यामध्ये २०० रुपये जास्तीचे घालून पहिला हप्ता ३००० किंवा त्यापेक्षा २५ ते ५० रुपयांनी जास्त अशा बेताने आपल्या पहिल्या उचली जाहीर केल्या आहेत.
ज्यावेळी शेतकरी संघटनांची व कारखानदारांची बैठक झाली, त्यावेळी कारखानदारांतही दोन गट दिसले. काही कारखाने ३००० रुपयांपेक्षा जास्त दर देण्यास तयार होते. पण इतर कारखानदारांनी त्यांना विरोध करून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवले. तुम्ही तयार असला तरी ‘स्वामिभानी’ने दर मागितला म्हणून तो दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेला याचे श्रेय जाईल, या शक्यतेने कारखान्यांनी शक्य असतानाही कमी दरास मान्यता दिली.
‘स्वाभिमानी’ने कारखानदारांचा प्रस्ताव मान्य केल्यानंतर मागितलेल्या दरामुळे खूपच खाली येऊन संघटनेने तडजोड केली, असा आरोप संघटनेवर झाला. याच कालावधीत कारखान्यांनी ३००० व त्याही पेक्षा काही रक्कम जादा देत पहिला हप्ता जाहीर केला. आम्ही दर इतकाच देणार होतो. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संबंधच काय? असा सवाल करीत कारखानदारांनी संघटनेला जादा दराचे श्रेय न देण्याचा प्रयत्न केला आहे.