पूर्वहंगामी ऊस लागवडीसाठी कोल्हापुरातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन

यंदाचा हंगाम तर गेला आहेच. परंतु, पुढील हंगामावरही परिणाम होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने ऊस लागवड करावी, यासाठी आम्ही आमच्या यंत्रणेमार्फत प्रयत्न सुरू केले आहे. शेतकऱ्यांना भेटणे, त्यांच्या शेतीची माहिती देणे, वाफसा स्थितीत रान आल्यास त्याला पुन्हा ऊस लागवडीसाठी तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे आदी कामे सुरू आहेत. - दिलीप जाधव, ऊस विकास अधिकारी, दत्त साखर कारखाना, शिरोळ.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर  : महापुरात नुकसान झालेल्या उसाचे कारखान्यांच्या वतीने सर्वेक्षण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महापुरामुळे जिल्ह्यातील सुमारे तीस ते पस्तीस टक्के उसाला यंदा फटका बसल्याने याचा फटका साखर कारखान्यांना बसणार आहे. नियमित गाळपापेक्षा यंदा एक ते दोन महिने अगोदरच ऊस गाळप हंगाम संपेल अशी भीती कारखानदारांतून व्यक्त होत आहे. बहुतांशी करून जून-जुलैमध्ये लागवड झालेल्या आडसाली लागवडीचे मोठे नुकसान झाले आहे. हा ऊस ऑगस्टपर्यंत दोन ते तीन महिने इतक्‍याच कालावधीचा असल्याने उसाचे संपूर्ण नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांनी तातडीने पूर्व हंगामी उसाचे नवे प्लॉट घ्यावेत यासाठी काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यास सुरवात केली आहे

जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्‍टर क्षेत्रावर ऊस आहे. यापैकी किमान चाळीस ते पन्नास हजार हेक्‍टर उसाला महापुराचा मोठा दणका बसला. याचे नुकसान पंचवीस टक्क्यांपासून शंभर टक्क्यांपर्यंत आहे. पूर्ण न बुडलेला ऊसही पाण्यात जास्त दिवस राहिल्याने खराब होत आहे. येत्या एक ते दीड महिन्यात कारखाने सुरू होणार आहेत. पण, तोपर्यंत अर्धवट खराब झालेला ऊस पूर्ण खराब होणार आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. आता कारखान्यांनी किमान पुढील हंगामात तरी ऊस कारखान्यांना यावा यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करण्यास प्रारंभ केला आहे.

बियाण्यांच्या उपलब्धतेबरोबरच नवीन तंत्रज्ञान, ऊस रोपे, सुपरकेन नर्सरीसारखे वेळ वाचविणारे तंत्रज्ञ शेतकऱ्यांना देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. सध्या कांड्या रोप लावण केल्यानंतर त्याची उगवण होण्यास वेळ लागत असल्याने शेतकऱ्यांनी रोप लागवडीला प्राधान्य देण्याचे आवाहन कारखाने करीत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी याबाबतची तयारी दर्शविली आहे. त्यांना खते व बियाणे तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी कारखाने प्रयत्नशील आहेत. अद्याप पुर्ण वाफसा नाही. यातच जिल्ह्यात पावसाच्या अधून मधून सरी कोसळत आहेत. यामुळे वाफशाला उशीर होणार आहे. साहजिकच ऊस लागवडी लांबणार आहेत. त्या जलद व्हाव्यात यासाठी कारखाने युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com