दक्षिण महाराष्ट्रातील साखर कारखान्यांपुढे आव्हान ऊस उपलब्धतेचे

मध्यंतरीच्या सलग पावसामुळे हंगाम प्रारंभ कधी होईल याबाबत साशंकता व्यक्त होत होती. गेल्या काही दिवसांपासून पाऊस थांबला आहे. यामुळे येत्या काही दिवसांत उसामध्ये वाफसा येण्याची शक्‍यता आहे. आता येत्या आठ ते दहा दिवसांत प्रत्यक्ष गाळपास सुरवात करण्याबाबत आमचे नियोजन सुरू आहे. - दिलीप जाधव, ऊस विकास अधिकारी, दत्त साखर कारखाना, शिरोळ, जि. कोल्हापूर.
राधानगरी तालुक्यात ऊसतोडणीला प्रारंभ झाला आहे
राधानगरी तालुक्यात ऊसतोडणीला प्रारंभ झाला आहे

कोल्हापूर  : दक्षिण महाराष्ट्रात पावसाने उसंत घेतल्यानंतर आता गाळप हंगामाच्या हालचाली गतिमान होत आहेत. गेल्या आठवड्यापासून पाऊस पूर्णपणे थांबल्याने साखर कारखानदारांमध्ये समाधान आहे. कारखानदारांनी गेल्या सप्ताहापासून बॉयलर प्रदिपनास सुरुवात केली आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सांगली, कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांतील गाळप हंगाम हळूहळू सुरू होण्याची शक्‍यता आहे. अशी स्थिती असताना दुसरीकडे कारखान्यांसमोर ऊस उपलब्धतेचे मोठे आव्हान आहे. 

महापुरापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात १३५ लाख मेट्रिक टन ऊस उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला गेला होता. पण जिल्ह्यातील सर्व नद्यांना पूर आल्याने ऊस कुजला आहे. अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादन घटले आहे. महापुराचा फटका बसल्याने जिल्ह्यात १०५ लाख मेट्रिक टन ऊस उत्पादन होईल, असा नव्याने अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोल्हापूरप्रमाणेच सांगली जिल्ह्यालाही महापुराचा फटका बसला. 

सांगली जिल्ह्यात ८२ लाख मेट्रिक टन ऊस उत्पादनाचा अंदाज होता. पण, पुरामुळे ६७ लाख मेट्रिक टनांवर ऊस उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. सध्या पाऊस थांबला ही एकमेव बाब कारखानदारांना सुखावत आहे. यामुळे अनेक कारखानदारांनी उसतोडणी कामगार तातडीने कारखाना कार्यक्षेत्रात बोलावले आहे. अनेक कारखान्यांची वाहने उसतोडणी कामगारांना आणण्यासाठी रवाना झाली आहेत. यंदा सगळ्यात मोठे आव्हान आहे ते ऊस उपलब्धतेचे. यातच शेजारील कर्नाटक राज्याने झोनबंदी लादल्याने कारखानदारांना फक्त कार्यक्षेत्रातील उसावरच अवलंबून रहावे लागणार आहे. दोन महिन्यांपूर्वी महापुराच्या तडाख्यात दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे ४० हजार हेक्‍टर क्षेत्रावरील उसाचे नुकसान झाले आहे. यामुळे ही घट कशी भरून काढायची या चिंतेत कारखाने आहेत.

सुरुवातीच्या टप्प्यापासूनच कारखान्यांमध्ये चांगला ऊस मिळविण्यासाठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. नद्यांच्या काठावरील उसाला रिकव्हरी मिळण्याची शक्‍यता धूसर आहे. या पार्श्‍वभूमीवर न बुडलेला व अतिवृष्टीच्या तडाख्यात तग धरलेल्या उसाच्या तोडीसाठी प्राधान्य दिले जाईल, असा अंदाज कारखाना वर्तुळातून व्यक्त होत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com