ताग पॅकिंगच्या सक्तीने १३५ कोटी भुर्दंड शक्य

केंद्राने यंदाच्या हंगामात साखरेच्या पॅकिंगसाठी वीस टक्के तागाच्या (ज्यूट) वापराची सक्ती केली आहे. सध्याच्या पी.पी. पोत्यांपेक्षा तागापासून तयार केलेली पोती ही महाग पडत असल्याने याचा फटका साखर उद्योगाला बसणार आहे.
sugar bag
sugar bag

कोल्हापूर : केंद्राने यंदाच्या हंगामात साखरेच्या पॅकिंगसाठी वीस टक्के तागाच्या (ज्यूट) वापराची सक्ती केली आहे. सध्याच्या पी.पी. पोत्यांपेक्षा तागापासून तयार केलेली पोती ही महाग पडत असल्याने याचा फटका साखर उद्योगाला बसणार आहे. वीस टक्के ताग पॅकिंग गृहीत धरल्यास टनाला १५ रुपयांचा भार कारखान्यांना पर्यायाने ऊस उत्पादकांनाही झेलावा लागणार आहे. यंदा राज्याचे संभाव्य गाळप ९०० लाख टन होण्याची शक्‍यता आहे. कारखान्यांनी केंद्राच्या निर्देशाप्रमाणे तागाचा वापर केल्यास १३५ कोटींचा भुर्दंड बसणार आहे.  केंद्राने ताग उद्योगातील कामगार व पश्‍चिम बंगाल, ओडिशा, आसाम, मेघालय, त्रिपुरा येथील ताग उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एकूण साखरेच्या पॅकिंगपैकी २० टक्के पॅकिंग हे तागापासून तयार केलेल्या पोत्यात करावे, असा निर्णय घेतला आहे. राज्यातील साखर कारखान्यांच्या पॅकिंगचा आढावा घेतल्यास सद्यःस्थितीत कोणतेच कारखाने ताग पॅकिंग करीत नाहीत. ५० किलोच्या पी.पी. पोत्यांची किंमत साधारणत: २० रुपये इतकी होते. जर तागाचे पोते वापरायचे झाल्यास ५० रुपये मोजावे लागतात. ५० किलोच्या पोत्यामागे तब्बल तीस रुपयांचा फटका कारखान्यांना बसतो. यामुळे कारखान्यांनी तागाला पसंती दिली नाही.  दोन दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पॅकिंगमध्ये तागाचा वापर २० टक्के करण्याचा निर्णय केंद्राने घेतला. सर्वसामान्य ग्राहकांसाठी ताग पॅकिंग किती असेल हे विचारविनिमय करून ठरणार असले, तरी कारखान्यांना मात्र ताग पॅकिंग करावेच लागणार आहे. परिणामी, केंद्राने जर सक्तीने हा निर्णय घेतला तर अडचणीत भरच पडणार असल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यांना भुर्दंड कशासाठी? केंद्राने ताग शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ताग वापराचा निर्णय घेतला आहे. कारखान्यांनी तागाचा वापर केल्यास कारखान्यांच्या साखर उत्पादन खर्चात वाढ होईलच. परंतु याचा भार राज्यातील ऊस उत्पादकांनाही सोसावा लागेल. यामुळे एका भागातील शेतकऱ्याला जगविण्यासाठी ऊस उत्पादकांना भुर्दंड कशासाठी असा सवाल साखर उद्योगातून व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया पी.पी. बॅग व तागाच्या पोत्याचा विचार केल्यास ताग वापरणे कारखान्यांना परवडणारे नाही. सध्याही कारखाने तागाची पॅकिंग शक्‍यतो करत नाहीत. तागाचा वापर सक्तीचा केल्यास त्याचा भुर्दंड राज्यातील कारखाने व शेतकऱ्यांना सोसावा लागू शकतो.  — विजय औताडे, साखर तज्ज्ञ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com