थंडीने गारठला साखर उद्योग 

देशांतर्गत साखर विक्रीचे संकट अजूनही कायमच आहे. एकीकडे किमान विक्री मूल्य (एमएसपी) वाढविण्याचा निर्णय लांबणीवर पडत असताना दुसरीकडे शिल्लक साठा हलण्यास तयार नाही.
Sugar
Sugar

कोल्हापूर : देशांतर्गत साखर विक्रीचे संकट अजूनही कायमच आहे. एकीकडे किमान विक्री मूल्य (एमएसपी) वाढविण्याचा निर्णय लांबणीवर पडत असताना दुसरीकडे शिल्लक साठा हलण्यास तयार नाही. साखरेची सर्वाधिक मागणी असलेल्या शीतपेय, आइस्क्रीम उद्योगाकडून साखरेची मागणी थंडीच्या लाटेमुळे घटली आहे. त्यामुळे डिसेंबर संपत आला तरीही दिलेला डिसेंबरचा साखर कोटा संपणे अशक्‍य बनले आहे. केंद्राने याचा विचार करून डिसेंबरचा साखर कोटा पंधरा जानेवारीपर्यंत वाढवून द्यावा, याच बरोबर जानेवारीचा साखर कोटा कमी करावा, अशी मागणी आता साखर उद्योगातून होत आहे. 

यंदा साखरेचे उत्पादन वाढत आहे. जसा साखरेचा हंगाम पुढे जाईल, तसा शिल्लक पडणाऱ्या साखरेचा दबाव कारखान्यांवर स्पष्ट दिसून येत आहे. केंद्राने देशातील साखर कारखान्यांना २२ लाख टनांचा कोटा दिला होता. पण डिसेंबरला देशात सर्वत्र थंडीची लाट आली. याचा विपरीत परिणाम शीतपेय, आइस्क्रीम उद्योगावर दिसून आला. या उद्योगाकडून मागणीत घट झाली. साखरेची बहुतांशी विक्री शीतपेय उद्योगाकडून होत असल्याने याचा थेट फटका कारखान्यांना बसला. परिणामी, कोट्याच्या पन्नास टक्केही साखर विकली नसल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. संपूर्ण देशातच ही परिस्थिती उद्‍भवली. नुकसान टाळण्याकरिता इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने केंद्राकडे डिसेंबरच्या साखर विक्रीची मुदत जानेवारीच्या मध्यापर्यंत वाढवून देण्याची मागणी केली आहे. जानेवारीचा कोटाही घटविण्याची त्यांची मागणी आहे. 

व्यापाऱ्यांकडून कमी दरात मागणी  ‘एमएसपी’ वाढीला विलंब होत असल्याने शासन तातडीने ही वाढ करणार नसल्याचा अंदाज बांधत व्यापाऱ्यांकडून पडेल भावाने साखर खरेदी करण्याचे प्रयत्न या महिन्यातही सुरूच राहिले. साखर कारखान्यांच्या ३१०० रुपयांच्या निविदेला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. परिणामी, अनेक कारखान्यांना नाइलाजास्तव कमी किमतीत साखर विकावी लागत असल्याचे चित्र डिसेंबरच्या शेवटीही कायम होते. साखर विक्रीचे आव्हान हंगाम सुरू होऊन तीन महिन्यानंतरही कायम आहे. सोलापूर, नगर बरोबरच मराठवाड्यातील साखर काही कारखाने नाइलाजास्तव कमी किमतीने साखर विक्री करून स्वत:चे नुकसान करून घेत असल्याची माहिती साखर उद्योगातील सूत्रांनी दिली.  प्रतिक्रिया संक्रांतीपर्यंत साखरेचा उठाव होण्याची शक्‍यता नाही. सध्या सगळीकडूनच साखरेची मागणी कमी झाली. यामुळे तयार होणारी साखर तशीच शिल्लक पडत आहे. संक्रातीनंतर मागणी वाढेल या अपेक्षेत आम्ही आहोत.  - एम. व्ही. पाटील, व्यवस्थापकीय संचालक, दत्त सहकारी साखर कारखाना, शिरोळ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com