कोरोनामुळे अंतिम टप्प्यातील ऊस हंगाम पूर्णत्वाचे आव्हान 

राज्यातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना आता या टप्प्यात कोरोनाचे संकट घोंघावत आहे. लॉकडाऊन झाल्यास अडकून पडू या भीतीने ऊसतोडणी कामगारांत अस्वस्थता पसरली आहे.
Factory
Factory

कोल्हापूर : राज्यातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना आता या टप्प्यात कोरोनाचे संकट घोंघावत आहे. लॉकडाऊन झाल्यास अडकून पडू या भीतीने ऊसतोडणी कामगारांत अस्वस्थता पसरली आहे. अनेक कारखान्यांच्या ऊसतोडणी मजुरांनी घरी परतण्याबाबत तगादा लावल्याने आता उर्वरित हंगाम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान कारखान्यांपुढे उभे राहिले आहे. 

राज्यातील गळीत हंगाम अजून एक महिना चालेल अशी शक्‍यता आहे. यंदा ऊसतोडणी कामगार कमी आल्याने त्याचा ताण सुरवातीपासूनच साखर कारखान्यांवर जाणवला. यामुळे बहुतांशी कारखान्यांनी यंत्राने ऊसतोडणीला प्राधान्य दिले. सध्या राज्यातील कारखान्यांची शेवटच्या टप्प्यातील ऊस तोडणी सुरु आहे. यातच कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. सध्या राज्यात विदर्भ, मराठवाड्यात कोरोनाचे संकट गडद आहे. या भागातील अनेक जिल्ह्यांत लॉकडाऊन सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर या भागातून पश्‍चिम महाराष्ट्र व अन्य भागातील कारखान्यांकडे ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांत भितीचे वातावरण पसरले आहे. याचा प्रतिकूल परिणाम ऊसतोडणीवर होत आहे. 

विशेष करुन पश्‍चिम महाराष्ट्रातील कारखान्यांकडे अजूनही एक ते सव्वा महिना पुरेल इतका ऊस शिल्लक आहे. अनेक ठिकाणी यंत्राने तोडणी करता येत नसल्याने त्यांना कामगारांवर अवलंबून राहावे लागणार आहे. कारखान्यांनी कामगारांची तपासणी नियमित केली असली तरी गेल्या वर्षी तब्बल दोन महिन्यांहून अधिक काळ अडकून पडलेल्या कामगारांनी गावाकडे जाण्यासाठी कारखान्यांकडे पिच्छा सुरु केला आहे. 

गेल्या वर्षी केवळ पश्‍चिम महाराष्ट्रातील सुमारे एक लाख ऊसतोडणी कामगार कारखान्यावरच अडकून पडले होते. एप्रिलच्या शेवटी शेवटी शासनाने खास निर्णय घेऊन कामगारांना विशेष गाड्यांनी त्यांच्या गावी पोचवले. यंदा मात्र पश्‍चिम महाराष्ट्रापेक्षा कामगारांच्या मूळ गावीच कोरोनाचे संकट नव्याने उभे ठाकले आहे. यामुळेच कामगारांत अस्वस्थता निर्माण झाल्याचे कारखाना प्रतिनिधींनी स्पष्ट केले.  कारखान्यांच्या शेती विभागाची कसरत  लवकर ऊस जात नसल्याने शेतकऱ्यांकडून तर कोरोनामुळे घरी जाण्यासाठी कामगारांकडूनचा दबाव कारखान्यांच्या शेती विभागावर येत आहे. ऊसतोडणी यंत्रणेमध्ये समन्वय साधण्यासाठी कारखान्यांच्या शेती विभागावर चांगलाच ताण येत असल्याचे चित्र बहुतांशी कारखान्यांत आहे. कामगारांच्या बैठका घेऊन त्यांची समजूत घालण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या ऊसतोडणीही वेळेत पूर्ण करण्याबाबतचे नियोजन द्रुतगतीने सुरु असल्याचे चित्र कारखान्यांच्या शेती विभागात आहे. 

राज्यातील गाळप स्थिती  सुरू कारखाने ः १८७  ऊस गाळप ः ८१८ लाख टन  साखर उत्पादन ः ८४ लाख टन  बंद झालेले कारखाने ः ९  अपेक्षित गाळप ः ९५० लाख टन  शिल्लक ऊस ः १३२ लाख टन 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com