देशात साखर उत्पादनात ४० लाख टनांनी वाढले

देशातील साखर कारखान्यांनी फेब्रुवारीअखेर २३३ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० लाख टनांनी साखरेच्या उत्पादनात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ४५३ साखर कारखाने सुरू होते.
Sugar
Sugar

कोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांनी फेब्रुवारीअखेर २३३ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० लाख टनांनी साखरेच्या उत्पादनात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ४५३ साखर कारखाने सुरू होते. यंदा ५०२ साखर कारखाने सुरू आहेत. देशाच्या उत्पादनात यंदाही महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक राहिला आहे. राज्यात कालावधीत ८५ लाख टनांचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत राज्याचे उत्पादन ५० लाख टनांचे होते. देशाचे उत्पादन ४० लाख टनांनी वाढले असले तरी त्यात महाराष्ट्राचा वाटा ३५ लाख टनांचा आहे. 

फेब्रुवारीअखेरच्या आकडेवारीवर नजर टाकली असता देशातील साखर वाढ ही महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील साखर उत्पादनामुळेच दिसून येते. गेल्या वर्षी या कालावधीत साखर उत्पादन १९४ लाख टन होते, आता ते २३३ लाख टनांवर गेले आहे. गेल्या वर्षीच्या उत्पादनापेक्षा २० टक्के जादा साखर उत्पादन झाले आहे.

सध्याच्या देशांतर्गत बाजारानुसार साखरेच्या मागणीत अजूनही वाढ झाली नाही. केंद्राने गेल्या वर्षीच्या मार्च इतकाच कोटा यंदाच्या मार्चलाही दिला आहे. उन्हाळ्यामुळे शीतपेय, मिठाई उद्योगाकडून साखरेला मागणी अपेक्षित धरून केंद्राने २१ लाख टनांचा कोटा दिला आहे. असे असले तरी ज्या प्रमाणात मागणीत वाढ अपेक्षित होती तितकी वाढ झाली नसल्याचे कारखानदार सूत्रांनी सांगितले. कमी किमतीत साखर मागणीचे प्रकार व्यापाऱ्यांकडून सुरुच असल्याने ‘एमएसपी’ दरात साखर विक्री करणे अद्यापही आव्हानात्मक ठरत असल्याचे कारखानदार सूत्रांनी सांगितले. ३२ लाख टनांचे साखरनिर्यात करार निर्यात धोरण जाहीर झाल्यापासून देशातून ३२ लाख टनांचे साखरनिर्यात करार झाले आहेत. कंटेनर अडचणीमुळे साखरनिर्यात अत्यंत धीम्या प्रमाणात होत आहे. विशाखापट्टणम बंदर व्यवस्थापनाने साखरनिर्यातीला प्राधान्य देत साखरेसाठी जहाजे उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक हालचाली सुरू केल्या आहेत. असेच प्रयत्न देशातील अन्य बंदरांकडून झाल्यास याचा फायदा साखर गतीने निर्यात होण्यासाठी होऊ शकतो, असा विश्‍वास कारखानदार प्रतिनिधींनी व्यक्त केला.

कर्नाटकातील हंगाम अंतिम टप्प्यात देशात पहिल्यांदा कर्नाटकातील हंगाम संपण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीअखेर ६६ पैकी तब्बल ५२ कारखान्यांनी गाळप थांबविले आहे. या खालोखाल महाराष्ट्रात १२, तर उत्तर प्रदेशात ११ कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात साखर कारखाने बंद होण्याची शक्यता साखर उद्योगाच्या सूत्रांनी व्यक्त केली.   राज्यनिहाय फेब्रुवारीअखेरचे साखर उत्पादन (लाख टन)

राज्य २०१९-२० २०२०-२१    
महाराष्ट्र ५०.७० ८४.८५
उत्तर प्रदेश ७६.८६ ७४.२०      
कर्नाटक ३२.६० ४०.५३      
गुजरात ६.८३ ७.४९  
तमिळनाडू ३.३७ ३.१६

(आकडेवारी स्रोत ः ‘इस्मा’)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com