कोल्हापूर : यंदाच्या हंगामातील साखर उत्पादनाने सुसाट वेग पकडला आहे. १५ जानेवारीअखेरपर्यंत देशातील ४८७ कारखान्यांनी १४२ लाख टन साखर उत्पादित केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ३३ लाख टनांनी यंदा उत्पादनात वाढ झाली आहे. पहिल्यापासून महाराष्ट्राने घेतलेली आघाडी या कालावधीतही कायम आहे. या कालावधीत राज्यातील १८१ कारखान्यांनी तब्बल ५१.५५ लाख टन साखर उत्पादित केली आहे. गेल्या वर्षीचे राज्यातील या कालावधीचे उत्पादन लक्षात घेतल्यास ते दुप्पट आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत राज्यात २५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षी शेवटपर्यंत आघाडीवर राहणाऱ्या उत्तर प्रदेशामध्ये मात्र आश्चर्यकरीत्या गेल्या वर्षीच्या तुलनेतही उत्पादन कमी झाले आहे. उत्तर प्रदेशात उसाची पुरेशी वाढ न झाल्याने रिकव्हरीत घट झाल्याने गेल्या वर्षी इतकेही उत्पादन काढताना उत्तर प्रदेशातील कारखान्यांची कसरत होत असल्याचे चित्र आहे. उत्तर प्रदेशात १२० कारखान्यांनी ४२.९९ लाख टन साखरनिर्मिती केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ११९ कारखान्यांनी ४३.७८ लाख टन साखर तयार केली होती. गुजरात, कर्नाटकात मात्र अपवाद वगळता गेल्या वर्षीइतकेच उत्पादन होत आहे. कारखानदार हवालदिलच... साखरेचे उत्पादन वाढत असले, तरी विक्रीच्या पातळीवर मात्र अद्याप प्रतिसाद नसल्याने कारखानदार हवालदिलच आहेत. वाढते उत्पादन कारखानदारांना चिंतीत करत असून, येत्या पंधरा दिवसांत साखरेचा किमान विक्रीचा दर वाढविण्यासाठी केंद्राकडे जोरदार प्रयत्न करण्यात येणार असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. केंद्रीय नेतृत्वाला याबाबाबतची माहिती राज्यातील कारखान्यांमार्फत देण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले. देशातील साखर उत्पादनाची स्थिती (१५ जानेवारी २०२१ अखेरची)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.