पुणे: राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या तुलनेत यंदा किमान दोन लाख टनाने घटण्याची शक्यता आहे. साखर उत्पादनाचा शासकीय अंदाज ५८ लाख टनाचा असला तरी ५३ ते ५५ लाख टन साखर तयार होईल, असे साखर उद्योगाचे म्हणणे आहे. दुष्काळ, अतिवृष्टी आणि इथेनॉल अशा तीन मुख्य मुद्यांचा विचार करता यंदा साखर उतारा घटणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. सहकार विभागाच्या म्हणण्यानुसार, उसातील साखर उतारा फारसा घटणार नसून फक्त एक ते दीड टक्का साखर ही आता बी हेव्ही प्रकल्पांसाठी वापरली जाणार आहेत. “साखर उत्पादन जरी कमी होणार असला तरी मूळ उतारा घटत नसून साखरेचा अंश बी हेव्ही प्रकल्पात वापरला जाऊन त्यामुळे इथेनॉलनिर्मिती वाढेल व तो पैसा देखील साखर कारखान्यांचा मिळेल,” असा युक्तिवाद प्रादेशिक साखर सहसंचालकांमधील कर्मचारी करतात. साखर कारखाना उद्योगाच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीचा साखर उतारा काही कारखान्यांमध्ये आतापासूनच पाच आणि सहा टक्के असा मिळतो आहे. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील उसाची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळे साडेआठ टक्क्यांऐवजी काही ठिकाणी सात-साडेसात टक्के उतारा मिळतो आहे. एरवी कारखाने सुरू होताना साखर उतारा कमीच असतो व तो वाढत जाऊन ११ ते १२ टक्के होतो. मात्र, यंदा उतारा कमीच मिळेल. कारण, मराठवाडा, सोलापूर, नगर भागांतील कारखान्यांना दुष्काळांचा फटका बसला आहे. शिवाय बी हेव्ही प्रकल्प सुरू झाल्यामुळे काहीही झाले तरी उतारा घटेल, असा अंदाज कारखान्यांकडून लावला जात आहे. राज्यात यंदा ५३ लाख टनांच्या आसपास साखर तयार होईल, असे कारखान्यांचे म्हणणे आहे. “राज्याचा साखर उतारा गेल्यावर्षी सरासरी ११.२६ टक्के होता. आम्ही यंदाचा उतारा ११.५० टक्के गृहित धरला आहे. यात घट होऊन तो ११.२४ ते ११.२५ टक्के असा राहू शकतो. मात्र, अगदी ९ किंवा १० टक्के इतक्या खालच्या पातळीपर्यंत उतारा घटण्याची शक्यता नाही,” असे सरकारी सूत्रांना वाटते. असे आहे साखर उत्पादनाचे चित्र
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.