दरामुळे साखरेचा रंग फिका

साखर
साखर

कोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही साखर उद्योगाचे शुक्‍लकाष्ठ संपत नसल्याची स्थिती आहे. शासनाने किमान विक्री मूल्य २९०० वरून ३१०० रुपये केल्यानंतरही परिस्थिती जैसे थेच असल्याने साखर उद्योगाचे अडचणीचे फेरे कायम आहेत. हंगाम अंतिम टप्प्यात येत असताना साखरेची मागणीच रोडावल्याने कारखान्यांचे साखर विक्रीचे महिन्याचे कोटे वाया जात आहेत.  गेल्या दोन महिन्यांत एकूण कोट्याच्या केवळ पंचवीस ते तीस टक्के इतकीच साखर विकली जात आहे. शिल्लक साखरेमुळे बॅंकेच्या व्याजाचा भुर्दंड मात्र कारखान्यांवर बसत असल्याने यंदा हंगामाची सांगता निराशेतच होणार आहे.  व्यापाऱ्यांची चतुराई  साखर ३१०० रुपये होणार असा अंदाज आल्यानंतर व्यापाऱ्यांनी साखरेची खरेदी केली होती. दोन महिन्यांपूर्वी साखरेची किमान विक्रीची किंमत शासनाने वाढविली. प्रत्यक्ष आदेश येइपर्यंत अनेक व्यापाऱ्यांनी साखर कारखान्यांकडून खरेदी करून ठेवली. काही कारखान्यांनी साखरेचा उठाव होत असल्याने जुन्या दरातच साखर विक्रीला प्राधान्य दिले. परंतू ज्या वेळी हे आदेश आले, त्या वेळेपासून मात्र साखरेची मागणी घसरली. बाजारात साखर उपलब्ध असल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी साखरेची खरेदी करण्यास नकार दिला. यामुळे कारखानदारांचे धाबे दणाणले. आता जुन्या दराने खरेदी केलेली साखर बाजारात आणून त्याची विक्री सुरू असल्याने साखर कारखान्यांकडील साखरेच्या मागणीला फटका बसत आहे. यामुळे कारखानदारात हंगाम संपतानाच अस्वस्थता पसरली आहे. एफआरपी देऊन मोकळे झालेल्या कारखान्यांपुढे मात्र हंगामात शेवटी शेवटी उसाचे गाळप झालेल्या शेतकऱ्यांची रक्कम कशी भागवायची याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मागणी वाढेल या अपेक्षेत असणाऱ्या कारखानदारांची घोर निराशा झाली आहे. फेब्रुवारी व मार्च मध्ये जितक्‍या साखरेचा उठाव व्हायला हवा होता तितका झाला नसल्याने आता शिल्लक साखरेचे संकट कारखान्यांपुढे घोंघावू लागले आहे.  कारखान्यांची केंद्राकडे धाव  साखर विक्री नसल्याने एफआरपीची उर्वरित रक्कम देऊच शकत नसल्याचे कारखानदारांनी सांगितले. तसेच बॅंका कर्ज देण्यास नकार देत असल्याचेही सांगण्यात आले. यामुळे केंद्र शासनाची मदत घेण्यासाठी कारखाने प्रयत्नशील आहेत. मदत मिळण्याबाबतचा प्रस्ताव साखर आयुक्तांमार्फत केंद्राकडे देण्यासाठी कारखानदारांची पळापळ सुरू असल्याची माहिती कारखाना सूत्रांनी दिली. बॅलन्स शीटचा गोंधळ  नव्या दराने साखर खरेदी करताना टेंडर जरी क्विंटलला ३१०० रुपयांचे निघाले तरी कारखान्यांना ३००० रुपयांप्रमाणेच रक्कम व्यापाऱ्यांनी दिली आहे. वरचे १०० रुपये डिपॉझिट म्हणून ठेवून घेतल्याने कारखान्यांच्या बॅलन्स शीटवर ३००० रुपयांनी साखर विक्री दिसत असल्याचे काही कारखान्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले. यामुळे ही साखर कमी दराने कारखान्यांनी विकली असा गैरसमज निर्माण होत असल्याचा समज होत आहे. मुळातच व्यापारी चतुराईमुळेच सध्या साखरेच्या बाजारात मंदीचे वातावरण तयार होत असल्याचे कारखानदारांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com