साखर कामगारांचे साडेचारशे कोटी थकले

राज्यातील साखर कारखान्यांची अवस्था बिकट आहे. आमच्याकडे कोणत्याच घटकांकडे लक्ष नाही. आम्हीही शेतकऱ्यांचीच मुले आहोत. पण, आमच्या संयमाचा अंत पाहिला आहे. हा प्रश्‍न मिटला नाही तर जानेवारीपासून तीव्र आंदोलन करू. - तात्यासाहेब काळे, अध्यक्ष, राज्य साखर कामगार संघ
साखर कामगारांचे साडेचारशे कोटी थकले
साखर कामगारांचे साडेचारशे कोटी थकले

कोल्हापूर : ऊस दरावरून शेतकरी संघटना, कारखानदार यांच्यात संघर्ष सुरू असताना राज्यातील सुमारे दीड लाख साखर कारखाना कामगारांच्या वेतनाचे  तब्बल साडेचारशे कोटी रुपये कारखान्यांकडे थकीत आहेत.

गेल्या दीड वर्षापासून एक छदामही कामगारांना मिळाला नाही. संसार चालविण्यासाठी मिळेल तेथून रक्कम आणून उदरनिर्वाह करीत असल्याने कामगारांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. शासनाने ‘वेज बोर्ड कमिटी’ स्थापनेकडे काणाडोळा करून दु:खाला डागण्याच देण्याचे काम केल्याने जानेवारीपासून सर्व कामगार काम बंद करण्याच्या मानसिकतेत आहेत. 

साखर कारखानदारी अडचणीत आल्याने त्याचा फटका जसा शेतकऱ्यांना बसत आहे, त्याचप्रमाणे याचा फटका कारखान्यांच्या कामगारांना बसत आहे. पगारीचा एक रुपयाही मिळत नसताना राज्यातील ऐंशी टक्क्‍यांहून अधिक कारखान्यांचे कामगार मेहनत करीत आहेत. आज ना उद्या थकीत पगार मिळेल, या अपेक्षेत असणाऱ्या कामगारांच्या पदरी पूर्णपणे निराशा पडली आहे. पूर्ण वेळ व हंगामी दोन्ही कामगारांची अशी स्थिती आहे.

कामगारांसाठी ‘वेज बोर्ड’च्या माध्यमातनू काम चालते. त्याची मुदत पाच वर्षे असते. याची मुदत संपून नऊ महिने झाले आहेत. मुदत संपल्यानंतर नवीन कमिटी नेमावी लागते. त्याचे कामकाज काही महिने चालल्यानंतर त्याच्या शिफारशीनुसार वेतन निश्‍चितीचे काम चालते. त्रिस्तरीय समिती असते. यामध्ये सरकार, कामगार व साखर संघांचे प्रतिनिधी असतात. कमिटी स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला गेला आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या सही अभावी ही कमिटी स्थापन झाली नाही. खरं तर यासाठी सरकारला कोणताच भुर्दंड बसत नाही. फक्त जीआर काढावा लागतो. पण तेही काम शासनाकडून न झाल्याने कामगार संघटनात प्रचंड असंतोष आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्रातही थकीत पगार वाढले

साखर उद्योगात अग्रेसर समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातही कामगारांच्या थकीत देणीचे प्रमाण लक्षणीय आहे. अनेक अग्रेसर कारखान्यांचे कामगार पगार गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत आहेत. कामगार प्रतिनिधींनी याबाबत कारखान्याला विचारल्यास साखर उचल झाली नसल्याने टर्न ओव्हर फिरत नाही, त्यामुळे तुमचा पगार देऊ शकत नाही असे सुनावले जाते. यामुळे कामगारांचा नाईलाज होत असल्याचे चित्र साखर पट्ट्यात आहे. 

कामगार संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

आता थकीत पगार सहन करणे कामगारांना अशक्‍य झाले आहे. संसार मोडकळीस येण्याची वेळ आल्याने कामगार संघटनांनी जिल्ह्यात मेळावे घेऊन याविषयी मते जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पगार नसल्याने आणि दुसरीकडे कुठे काम शक्‍य नसल्याने अक्षरश: आत्महत्या करण्याची वेळ कामगारांवर येत असल्याचा सूर कामगारांच्या मेळाव्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी आंदोलन केले तर ते आपला ऊस दुसऱ्याला देऊ शकतात. पण, कारखान्याच्या विरोधात आंदोलन केले तर जायचे कुठे? असा प्रश्‍न असल्याने साखर कामगार तोंड दाबून बुक्‍याचा मार सहन करत असल्याची स्थिती आहे. यामुळे डिसेंबरपर्यंत वाट पाहून त्यानंतर चिमणी बंद व कोयता बंद आंदोलन करण्याच्या मानसिकतेत कामगार आहेत. असे झाले तर पूर्ण हंगामच बंद पडण्याची भीती आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com