...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन

ऊसतोड कामगार
ऊसतोड कामगार

मुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या स्थापनेचा शासन आदेश नुकताच जारी झाला आहे. महामंडळाच्या अध्यक्षपदी माजी आमदार केशव आंधळे यांची नियुक्ती करण्यात आली. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात या महामंडळाबाबत शब्द दिला होता. मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे ही स्थापना लांबणीवर पडली होती. अखेर ऊसतोड कामगारांची मागणी असलेल्या महामंडळाची स्थापना करण्यात आली.  ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी गोपीनाथ मुंडे यांनी कायम संघर्ष केला. सरकारने त्यांच्या नावाने स्थापन केलेले ऊसतोड महामंडळ हा राज्यातील ऊसतोड मजुरांच्या भावनेचा आणि जिव्हाळ्याचा विषय होता. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी महामंडळ लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी ऊसतोड संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. सुरवातीला महामंडळाऐवजी ऊसतोड कामगार योजना लागू करण्यात होती. मात्र, ऊसतोड मजुरांची मागणी लक्षात घेऊन पंकजा मुंडे यांनी महामंडळ स्थापन व्हावे, यासाठी आग्रह धरला आणि महामंडळाचा आराखडाही निश्चित केला. या महामंडळासाठी आकस्मिकता निधीमधून १४५ कोटी निधी मंजूर करण्यात यावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार केशव आंधळे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. यासह अन्य आठ सदस्यही त्यात असणार आहेत. राज्यातील १०१ सहकारी आणि ८७ खासगी कारखान्यात अंदाजे ८ लाख ऊसतोड कामगार काम करतात. या कामगारांना मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतर करावे लागते, शिवाय बहुतांश कामगार हे बीड जिल्ह्यातील आहेत. कामगारांना साखर कारखाना संघाच्या स्तरावरून होणाऱ्या सामंजस्य करारानुसार मजुरी आणि इतर लाभ देण्यात येतात. पण या कामगारांचे जीवन अत्यंत हलाखीचे असते. ऊसतोड कामगारांना भविष्य निर्वाह निधी, कामगार राज्य विमा योजना, उपदान, नुकसानभरपाई, सानुग्रह उपदान अशा सामाजिक योजनांचे लाभ मिळत नाहीत. स्थलांतर केल्यामुळे ऊसतोड कामगारांच्या मुलांना कायम शिक्षणाशिवाय रहावे लागते. या विविध समस्यांवर तोडगा मंहामंडळाच्या माध्यमातून निघणार आहे, शिवाय सर्व योजनांचाही लाभ कामगारांना मिळेल. असे आहे महामंडळ

  • माजी आमदार केशव आंधळे महामंडळाच्या अध्यक्षपदी
  • अन्य आठ सदस्यांचाही महामंडळात समावेश असेल
  • आकस्मिकता निधीमधून १४५ कोटी मंजूर 
  • राज्यात अंदाजे ८ लाख ऊसतोड कामगार
  • ऊसतोड कामगारांना भविष्य निर्वाह निधी, कामगार राज्य विमा योजना, उपदान, नुकसानभरपाई, सानुग्रह उपदान अशा सामाजिक योजनांच्या लाभासाठी तोडगा काढणार
  • ऊसतोड कामगारांची दिशाभूल ः धनंजय मुंडे दरम्यान, विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यास काही तासांचा कालावधी राहिला असताना ऊसतोड कामगारांसाठी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने जाहीर केलेले महामंडळ म्हणजे निवडणुकांसाठी ऊसतोड कामगारांना आणखी एक गाजर आहे. हा त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. या महामंडळाला कुठलेही अधिकार, महामंडळाचे नियम, कार्यक्षेत्र याबाबत कोणतीही बाब ठरवण्यात आली नसून अशा प्रकारे महामंडळ ठरवण्याचा हा एक देशातला नवीनच विक्रम असेल, अशी खोचक प्रतिक्रिया ही धनंजय मुंडे यांनी दिली. ऊसतोड कामगार सरकारच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com