कारंजालाड, जि.
ताज्या घडामोडी
‘स्वाभिमानी’च्या ऊस परिषदेला दिवाळीनंतरच मुहूर्त?
कोल्हापूर ः प्रत्येक ऊस गाळप हंगाम सुरू होण्याअगोदर होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेला यंदा दिवाळीनंतरच मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. सध्या निवडणुकीच्या धामधुमीमुळे सध्या कोणालाच यंदाच्या गाळप हंगामाबाबत विचार करावयास वेळ नसल्याने ही परिषद दिवाळीनंतरच होईल अशी शक्यता आहे. लोकसभेतील पराभव, सोडून गेलेले शिलेदार या पार्श्वभूमीवर यंदाची ऊस परिषद कशी होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कोल्हापूर ः प्रत्येक ऊस गाळप हंगाम सुरू होण्याअगोदर होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेला यंदा दिवाळीनंतरच मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. सध्या निवडणुकीच्या धामधुमीमुळे सध्या कोणालाच यंदाच्या गाळप हंगामाबाबत विचार करावयास वेळ नसल्याने ही परिषद दिवाळीनंतरच होईल अशी शक्यता आहे. लोकसभेतील पराभव, सोडून गेलेले शिलेदार या पार्श्वभूमीवर यंदाची ऊस परिषद कशी होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दक्षिण महाराष्ट्रात ‘स्वाभिमानी’च्या ऊस परिषदेला महत्व आहे. प्रत्येक वर्षी संघटनेच्या भूमिकेवर साखर कारखानदार व हंगाम याचे गणित ठरत असते. गेल्या सहा महिने मात्र ‘स्वाभिमानी’च्या दृष्टीने फारसे सुखावह गेलेले नाहीत.
‘स्वाभिमानी’चे राजू शेट्टी यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे संघटनेत मोठी मरगळ आली आहे. श्री. शेट्टी यांनी खासदारकीच्या काळात अनेक देशव्यापी नेत्यांना एकत्र करीत शेतकरी प्रश्नासंदर्भात एकी करण्याचा प्रयत्न केला होता. याचा ऊहापोहही या परिषदेत व्हायचा. यंदा मात्र स्थिती वेगळी आहे. श्री. शेट्टी यांच्या पराभावानंतर ‘स्वाभिमानी’च्या गोटात अस्वस्थता आहे. यातच संघटनेकडे कोणतेही पद नाही.
प्रत्येक वर्षी सदाभाऊ खोत, रविकांत तुपकर यांच्या दणकेबाज भाषणांनी परिषदेत उत्साह असायचा. यंदा श्री. खोत यांच्यापाठोपाठ तुपकरही संघटनेबाहेर गेल्याने श्री. शेट्टी यांची अडचण झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत नैसर्गिक आपत्तीमुळे दक्षिण महाराष्ट्रातील सुमारे ४० टक्के उसाचे नुकसान झाले आहे. पुरातून वाचलेला ऊसही लवकर तोडणीस गेला नाही, तर त्याचेही नुकसान होऊ शकते. यामुळे कारखाने लवकर सुरू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांची होती. परंतु निवडणुकीच्या धामधुमीत याकडे कोणीच लक्ष दिले नाही.
यंदाचा हंगाम प्रतिवर्षीपेक्षा उशिरा सुरू होईल असा अंदाज आहे. केंद्राने गेल्या वर्षी इतकीच एफआरपी कायम ठेवली आहे. ती पुरेशी आहे का किंवा यंदाच्या पार्श्वभूमीवर मिळणारी एफआरपी शेतकऱ्यांना परवडेल याबाबत चर्चा अपेक्षित होती. परंतु सध्या तरी तसे काहीच होत नसल्याचे चित्र आहे.
यंदाच्या हंगामाबाबत ना ‘स्वभिमानी’ने भूमिका स्पष्ट केली आहे ना कारखानदारांनी. सगळेच निवडणुकीत व्यस्त असल्याने आॅक्टोबर उजाडला तरी ऊस पट्ट्यात शांतताच आहे. प्रत्येक वर्षी दराबाबत काही तरी भूमिका घेऊन ऊस परिषदेपूर्वी संघटनेचे दौरे ऊस पट्ट्यात सुरू असतात. यंदा उत्पादकांना कितपत दर मिळाला पाहिजे याचा अंदाज त्यात घेतला जातो. परंतु सध्यातरी श्री. शेट्टी यांच्यासह ‘स्वाभिमानी’चे पदाधिकारी निवडणुकीची जुळणी करण्यातच व्यस्त आहेत. यामुळे सध्या तरी ऊस प्रश्नाकडे लक्ष देण्यास संघटनेच्या कोणालाच वेळ नसल्याची स्थिती आहे. यामुळे ऊस हंगामाची चर्चा व ऊस परिषद दिवाळीनंतरच होण्याचा अंदाज आहे. ‘स्वभिमानी’च्या पदाधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.
- 1 of 582
- ››