औरंगाबाद : येथील साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या सहा जिल्ह्यांतील २२ सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात आतापर्यंत ६६ लाख १७ हजार ५३१ टन उसाचे गाळप करून ६३ लाख ६२ हजार ४१७ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.६१ टक्के आहे.
औरंगाबाद येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना, बीड, धुळे, नंदूरबार, जळगाव हे सहा जिल्हे येतात. या सहा जिल्ह्यांतील २२ सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नोंदविला. धुळे जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने गाळपात सहभाग नोंदविला नाही.
नंदूरबार जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी ८ लाख ४१ हजार ८४६.२८ टन उसाचे गाळप केले. याद्वारे ८ लाख २१ हजार ३८३ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी ३ लाख ५१ हजार ८२७.६१ टन उसाचे गाळप करताना ३ लाख १७ हजार २० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
औरंगाबाद जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी ११ लाख ७८ हजार १४३ टन उसाचे गाळप करीत ११ लाख ३४ हजार २२५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. जालना जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी १५ लाख ६५ हजार १९८ टन उसाचे गाळप करीत १५ लाख २२ हजार ८०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. बीड जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांनी यंदा आजवर २६ लाख ८० हजार ५१५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. यामधून २५ लाख ६७ हजार ४५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
बीड जिल्ह्यात ऊस गाळप हंगामात सहभाग नोंदविणाऱ्या सात साखर कारखान्यांपैकी येडेश्वरी शुगर कारखान्याचा साखर उतारा १०.३९, जालना जिल्ह्यातील श्रद्धा एनर्जी अँड इन्फाचा साखर उतारा १०.४८, तर औरंगाबाद जिल्ह्यातील मुक्तेश्वर शुगर्सचा साखर उतारा १०.१८ टक्के आहे.