नगर ः जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली आहे. मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक असल्याने चार सहकारी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम मे अखेरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. जास्त ऊस असलेल्या कारखान्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस इतर कारखान्यांना देण्याची तयारी दर्शविली असून, ‘मुळा’ने काही ऊस इतर कारखान्यांना दिला आहे.
जिल्ह्यात मागील दोन वर्षांत समाधानकारक पाऊस झाल्यामुळे, तसेच धरणांमध्ये पाणीसाठा चांगला असल्यामुळे अनेक ठिकाणी उसाचे क्षेत्र वाढले. पर्यायाने ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. या वर्षीचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच कारखान्यांना गाळपाचा अंदाज आला होता. एकीकडे ऊस उत्पादन वाढले असतानाच, दुसरीकडे साखरेचे दर कोसळल्याने कारखानदार धास्तावले होते.
ज्ञानेश्वर, मुळा, अशोक या तीन सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्याकडे त्याची नोंददेखील झाली आहे. त्यामुळे हे कारखाने मेअखेरपर्यंत चालण्याची शक्यता अधिक आहे. त्यातील अशोक आणि मुळा हे कारखाने ३१ मेपर्यंत, ज्ञानेश्वर कारखाना २० मेपर्यंत आणि वृद्धेश्वर कारखाना १५ मेपर्यंत चालण्याची शक्यता आहे.
मुळा कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस इतर काही कारखान्यांना दिला आहे. आतापर्यंत कुकडी, शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदे), संजीवनी (कोपरगाव) या तीन सहकारी कारखान्यांचे आणि साईकृपा क्रमांक एक, पीयूष शुगर अँड पॉवर लि., क्रांती शुगर, जय श्रीराम शुगर, अंबालिका शुगर या खासगी अशा आठ कारखान्यांचे गाळप हंगाम बंद झाले आहेत.
उर्वरित कारखाने ३० एप्रिलपर्यंत बंद होण्याची शक्यता आहे. मुळा, अशोक, ज्ञानेश्वर आणि वृद्धेश्वर वगळता जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांचे गळीत हंगाम एप्रिलअखेरपर्यंत बंद होतील, अशी माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने दिली आहे.