नांदेड ः येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय विभागांतर्गत असलेल्या मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील १४ सहकारी आणि १८ खासगी अशा एकूण ३२ साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामात सोमवारपर्यंत (ता. १९) १ कोटी ६ लाख ९२ हजार ९५५ टन ऊस गाळप केला आहे. १ कोटी १२ लाख ६० हजार ७८६ क्विंटल साखर उत्पादन घेतले. सरासरी १०.५३ टक्के साखर उतारा आला आहे. परभणी जिल्ह्यातील २, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी १ अशा एकूण ५ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे.
२०१७-१८ च्या गळीत हंगामात नांदेड प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत परभणी जिल्ह्यातील ५, हिंगोली जिल्ह्यातील ४, नांदेड जिल्ह्यातील ५, लातूर जिल्ह्यातील ८, उस्मानाबाद जिल्ह्यातील १० अशा पाच जिल्ह्यांतील ३२ साखर कारखान्यांनी गाळप केले.
सोमवारपर्यंत परभणी जिल्ह्यातील सर्व ५ खासगी साखर कारखान्यांनी एकूण १६ लाख ५६ हजार ४९३.२८ टन ऊस गाळप केला असून सरासरी १०.१८ टक्के उताऱ्याने ११ लाख ८५ हजार ७७० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. पूर्णा तालुक्यातील बळिराजा शुगर्सचा सरासरी साखर उतारा सर्वाधिक १०.९० टक्के आला आहे. रत्नप्रभा-रेणुका शुगर्स आणि मोहटादेवी नृसिंह शुगर्स या दोन साखर कारखान्यांनी गाळप बंद केले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व ४ सहकारी साखर कारखान्यांनी १० लाख ७८ हजार ४४० टन ऊस गाळप केला आहे. सरासरी १०.७२ टक्के साखर उतारा आला असून ११ लाख ५५ हजार ८७५ क्विंटल साखर उत्पादन केले आहे.
भाऊराव चव्हाण युनिट २ डोंगरकडा या कारखान्याचा सरासरी साखर उतारा सर्वाधिक ११.४४ टक्के आला आहे. पूर्णा युनिट २ (बाराशिव) साखर कारखान्याचा गळित हंगाम आटोपला आहे.
नांदेड जिल्ह्यातील ३ सहकारी आणि २ खासगी अशा एकूण ५ साखर कारखान्यांनी एकूण १२ लाख २८ हजार ७४ टन ऊस गाळप केला आहे. सरासरी १०.७८ टक्के उताऱ्याने १३ लाख २३ हजार ५११ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक ११.१४ टक्के आला आहे. शिवाजी सर्व्हिस स्टेशन (जय शिवशंकर) कारखान्याचे गाळप बंद झाले.
लातूर जिल्ह्यातील ४ सहकारी आणि ४ खासगी अशा एकूण ८ साखर कारखान्यांनी ३० लाख ७४ हजार ७० टन ऊस गाळप केले आहे. सरासरी ११.०६ टक्के साखर उतारा आला असून एकूण ३३ लाख ९९ हजार ७४० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.जागृती शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक ११.५५ टक्के आला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ सहकारी आणि ७ खासगी असे एकूण १० साखर कारखान्यांनी ३६ लाख ५५ हजार ८७८ टन ऊस गाळप केले असून सरासरी १०.११ टक्के साखर उतारा मिळाला आहे. एकूण ३६ लाख ९५ हजार ८९० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. नॅचरल शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक ११.०६ टक्के आला आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याचे गाळप बंद झाले आहे.