पुणे ः जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम वेगात सुरू आहे. जिल्ह्यातील कारखान्यांनी आतापर्यंत १०३ लाख ७ हजार ७८९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, ११५ लाख ५२ हजार १७० क्विटंल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ११.२१ टक्के साखर उतारा असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यात उसाचे सुमारे एक लाख तीस हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र असते. यंदाही मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. आत्तापर्यंत ७० ते ८० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील उसाचे गाळप झाले आहे. जिल्ह्यात एकूण सतरा साखर कारखाने आहेत. यात सहकारी अकरा; तर खासगी सहा साखर कारखान्यांचा समावेश आहे.
या सर्व कारखान्यांमध्ये एक ते २१ नोव्हेंबर या कालावधीत गाळप सुरू झाले होते. या कारखान्यांची दैनंदिन ऊस गाळप क्षमता जवळपास अडीच ते आठ हजार मेट्रिक टन एवढी आहे. सध्या कारखान्यांचा हंगाम अर्ध्याहून अधिक संपला आहे. जिल्ह्यातील कारखान्यांचा हंगाम पंधरा मेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी ६६ लाख ७६ हजार ९४२ टन उसाचे गाळप केले आहे. साखरेचे ७४ लाख २७ हजार ८१५ क्विंटल साखर उत्पादन झाले असून, साखर उतारा ११.१२ टक्के एवढा आहे.
खासगी साखर कारखान्यांनी ३६ लाख ३० हजार ८४७ टन उसाचे गाळप केले आहे. साखरेचे ४१ लाख २४ हजार ३५५ क्विंटल उत्पादन झाले आहे. साखर उतारा ११.३६ टक्के एवढा आहे.
जिल्ह्यात बारामती अॅग्रो साखर कारखान्याने सर्वाधिक दहा लाख ५ हजार २५० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून साखरेचे ११ लाख ४३ हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन झाले असून, साखर उतारा ११.३८ टक्के एवढा आहे.
दौंड शुगर कारखान्याने साखर उताऱ्यात आघाडी घेतली असून, या कारखान्याचा सरासरी ११.८० टक्के साखर उतारा आहे. या कारखान्याने ८ लाख ७९ हजार ८९० टन उसाचे गाळप केले. त्यातून दहा लाख ३८ हजार १०० क्विंटल साखर उत्पादन झाल्याचे पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.