सांगली ः जिल्ह्यात गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून उसाची लागवड सुरू झाली. जून महिन्याच्या अखेर ५ हजार ३१२ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे.
मुळात, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून आडसाली उसाची लागवड केली जाते. यंदा उन्हाळी पाऊस समाधानकारक झाला. त्यामुळे उस पिकाची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी मशागती पूर्ण केल्या. जिल्ह्यात गतवर्षी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर संततधार पाऊस झाला. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात महापुराचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता.
दरम्यान, गेल्या वर्षी जून आणि जुलै महिन्यात लागण केलेले ऊस पीक पाण्याखाली आहे. त्यामुळे उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यंदा अतिवृष्टी आणि पूराच्या भीतीमुळे जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा काठी ऊस पिकाची लागवड मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच सुरुवात झाली. महापूर आला तरी, ऊस पिकाला याचा अधिक फटका बसणार नाही. यामुळे शेतकरी आडसाली उसाची लागवड करण्यासाठी पुढे आले.
सध्या जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात सर्वाधिक उसाची लागवड झाली आहे. अनेक भागात मॉन्सूनचा दमदार पाऊस झाला. हा पाऊस ऊस पीक वाढीसाठी उपयुक्त ठरत आहे. सध्या पावसाचा खंड पडला असला तरी, शेतकरी ऊस लागवडीसाठी नियोजन करू लागले आहेत. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून आडसाली ऊस लागवडीची गती वाढेल, अशी माहिती कृषी विभागाने दिली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.