सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मोजकेच मजूर असल्यामुळे तोडणीचे काम धीम्या गतीने सुरू आहे. आतापर्यंत फक्त १५ टक्केच तोडणी पूर्ण झाली आहे. ऊसतोडणी कामगारांचे ४५ समूह तोडणीचे काम करीत आहे. एका यंत्राद्वारेदेखील तोडणीचे काम सुरू आहे.
जिल्ह्यात एकूण १ हजार ५२० हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे. गेल्या काही वर्षांत ऊस लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना (असळज, ता. गगनबावडा), भोगावती कारखाना (ता. राधानगरी), फराळे कारखाना (जि. कोल्हापूर) या कारखान्यांना ऊस पाठविला जातो. साधारणपणे ९० हजार टन ऊस उत्पादन होतो. २२ नोव्हेंबरपासून यंदाच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली. त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी कारखान्यांनी सिंधुदुर्गात तोडणी मजूर समूह पाठविण्यास सुरुवात केली.
हंगाम सुरू झाल्यानंतर सव्वा महिन्यात अवघ्या १४ हजार टन उसाची तोडणी करण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित तोडणी होणार कधी? असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर आहे. त्यातच पाळीपत्रकात बदल करून ऊसतोडणी करीत असल्याचा काही शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. त्या अनुषंगाने काही शेतकऱ्यांनी तीन चार दिवसांपूर्वी कासार्डे येथील गटकार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्यांच्या उभारणीनंतर सिंधुदुर्गात ऊस लागवडीला चालना मिळाली. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली या दोन तालुक्यांचा समावेश आहे. तोडणी वेळेत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा उसाकडील ओढा कमी झाला. दोन वर्षांपूर्वी १ हजार ७०० हेक्टर असलेले क्षेत्र आता १ हजार ५२० वर आले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.