कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी उसाची वाढ खुंटली

सातत्याने कडक ऊन व ढगाळ हवामान असे वातावरण दिवसभर ऊस पट्ट्यात आहे, यामुळे उसावर हुमणी, तांबेरा या कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परिणामी भर पावसाळ्यातही उसाचे व्यवस्थापन करणे हे शेतकऱ्यांसाठी आव्हान ठरत आहे.
Sugarcane growth stunted in Kolhapur district due to insufficient rainfall
Sugarcane growth stunted in Kolhapur district due to insufficient rainfall

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने याचा विपरीत परिणाम उसाच्या वाढीवर होत आहे. पावसाळी हवामानाअभावी ऊस पिकाची वाढ खुंटत आहे. पाणी देऊनही उसाची अपेक्षित वाढ होत नसल्याने शेतकरी हवालदिल आहेत. त्यातच सातत्याने कडक ऊन व ढगाळ हवामान असे वातावरण दिवसभर ऊस पट्ट्यात आहे, यामुळे उसावर हुमणी, तांबेरा या कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परिणामी भर पावसाळ्यातही उसाचे व्यवस्थापन करणे हे शेतकऱ्यांसाठी आव्हान ठरत आहे.

जिल्ह्यात गाळपासाठी सुमारे सव्वा दोन लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात ५० हजार हेक्टरने क्षेत्रात वाढ झाली आहे. गेल्यावर्षी महापुराचा फटका बसल्यानंतर सप्टेंबरपासून शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला प्राधान्य दिले. गेल्या महापुराच्या तडाख्यात इतर पिकांचे मोठे नुकसान झाले त्या तुलनेत उसाचे कमी नुकसान झाले. त्यामुळे गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांऐवजी ऊस पिकाला प्राधान्य दिल्याने यंदा ऊस पिकाचे क्षेत्र वाढल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला प्रशासनाकडून महापुराच्या सूचना देण्यात येत होत्या. परंतु, ऑगस्ट महिना उजाडला तरी नियमित पाऊसही न पडल्याने याचा फटका उत्पादकांना बसत आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागात आडसाली उसाचे क्षेत्र जास्त असते. यंदाही शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवडीस प्रारंभ केला आहे, पण लागवडीच्या वेळेस पावसाने खो दिल्याने शेतकरी हवालदिल आहेत. पावसाळी हवामान नसल्याने लागवड केलेल्या उसाच्या वाढीवर मर्यादा येत आहेत. पाण्याची सोय असूनही उष्ण हवामान कायम असल्याने उसाची वाढ म्हणावी तशी होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जून-जुलैमध्ये शेतकऱ्यांनी जादा पाणी देऊन ऊस जगण्यासाठी धडपड सुरू ठेवली. ऑगस्टमध्ये पाऊस झाला नाही तर उसाची वाढ थांबून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता कारखाना प्रतिनिधींनी व्यक्त केली.

जूनमध्ये थोडासा पाऊस पडला. त्याआधारे अजूनपर्यंत ऊस तग धरून आहे. जुलैमध्ये पावसाने दडी मारल्याने उसाची वाढ खुंटण्याच्या अवस्थेत आहे.ऑगस्टमध्ये पावसाची नितांत आवश्यकता आहे, अन्यथा उत्पादनात घट निश्चित आहे. - दिलीप जाधव, ऊस विकास अधिकारी, दत्त साखर कारखाना, शिरोळ.

पावसाने तर ताण दिलेला आहेच.  त्यातच भर म्हणून मोठ्या प्रमाणात उष्णता आहे. पावसाळ्यातील गारवा अद्यापही नाही. याचा फटका ऊस पिकाला बसत आहे. पिकाची वाढ खुंटणे त्याबरोबरच कीड-रोगांचा प्रादुर्भाव उसावर होत आहे. - संजय सुतार, कृषी पर्यवेक्षक.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com