सांगली ः जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव, शिराळा तालुक्यांत पाण्याची उपलब्धता असल्याने ऊस क्षेत्रात वाढ झाली आहे. दुष्काळी पट्ट्यात उसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली असल्याचे दिसत असले तरी, गतवर्षीपेक्षा २०१८-१९ मध्ये गाळपाला जाणाऱ्या उसाच्या क्षेत्रात तब्बल ९७४२ हेक्टरने वाढ झाली आहे. वाळवा तालुक्यात ३ हजार २१६ हेक्टरने ऊस क्षेत्र वाढले आहे.
जिल्ह्यात वाळवा, कडेगाव आणि शिराळा तालुक्यांत पुरेसे पाणी उपलब्ध असल्याने आडसाली, पूर्वहंगामी, सुरु या हंगामातील उसाची लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे आले. तसेच खोडवा ठेवण्याचे प्रमाणदेखील गतवर्षीपेक्षा वाढले आहे.
जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये ८० हजार १७६ हेक्टर क्षेत्रातील उसाचे गाळप झाले. २०१८-१९ मध्ये होणाऱ्या गाळपासाठी उसाची लागवड पूर्ण झाली आहे. कृषी विभागाने ऊस लागवडीचा अंतिम अहवाल तयार केला असून ८९ हजार ९१८ हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली आले आहे.
तासगाव तालुका तसा द्राक्ष पट्टा म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात पाणी टंचाई आहेच. मात्र, यंदा उसाच्या क्षेत्रात ५५० हेक्टरने वाढ झाली आहे. तर जत तालुक्यात ५५३ हेक्टरने वाढ झाली आहे. ज्या शेतकऱ्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे, अशाच शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली असल्याची माहिती कारखान्यांच्या सूत्रांनी दिली.
दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि खानापूर तालुक्यांत ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन उशिरा सुरू झाल्याने त्याचा परिणाम ऊस लागवडीवर झाला आहे. या तीन तालुक्यांतून २०१७-१८ मध्ये ८३५१ हेक्टरवरील ऊस कारखान्यास गाळपासाठी गेला. मात्र २०१८-१९ साठी ६२२६ हेक्टर क्षेत्रावरील ऊस कारखान्याला गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. याचाच अर्थ असा की, पाणी टंचाई असल्याने या तिन्ही तालुक्यांतून २१२५ हेक्टरने ऊस क्षेत्रात घट झाली आहे.