कोल्हापूर : महापूर व अतिवृष्टीमुळे यंदा कोल्हापूर विभागात गेल्या वर्षीच्या तुलनेत १८ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन घटले आहे. १५ डिसेंबरअखेर २९ लाख मेट्रीक टन उत्पादन झाले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी १९ लाख, तर सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी १० लाख मेट्रिक टन साखरेचे गाळप केले. गेल्या वर्षी कोल्हापूर विभागात १५ डिसेंबरअखेर तब्बल ४७ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. यात यंदा मोठी घट झाल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.
विभागाच्या रिकव्हरीमध्ये एक ते दोन टक्क्यांनी घट होत असल्याने साखरेच्या उत्पादनावरही याचा विपरित परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ५८ लाख ८९ हजार मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा ३० लाख २४ हजार साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे.
गेल्या हंगामाच्या तुलनेत विभागाचा साखर हंगाम तब्बल दीड महिना उशिराने सुरू झाला. यातच पुन्हा अवकाळी पाऊस व अन्य कारणांमुळे हंगामाची सुरवात धीम्या गतीने झाली. राज्याच्या तुलनेत विभागात सर्वाधिक गाळप झाले असले, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र उसाचे गाळप कमी प्रमाणात होत आहे.
सध्या कारखान्यांकडून पूरग्रस्त भागातील उसाचे गाळप प्राधान्याने सुरू आहे. परंतु उत्पादकांना हा ऊसतोडीसाठीही ऊसतोडणी कामगारांना पैसे द्यावे लागत असल्याचे चित्र आहे.
उसाला चारा (वाडे) नसल्याने ऊसतोडणी कामगार ऊसतोडीसाठी पैशांची मागणी करत आहे. ऊसतोडणी लवकर व्हावी, यासाठी शेतकरीही शक्य होईल तेवढी रक्कम देऊन उसाची तातडीने तोड करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यामुळे नियमित वेळेपेक्षा लवकर ऊसतोडणी होत असली, तरी उत्पादकांना मात्र मनस्तापच सहन करावा लागत असल्याचे चित्र शिवारात आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.