कोल्हापूर : ऊस वाहतूकदारांना नऊ टक्के वाढ देण्याचा निर्णय सोमवारी (ता. १०) सायंकाळी झाला. त्यानंतर शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील ऊसतोडणी वाहतूक बंद आंदोलन मागे घेण्यात आले. यामुळे या दोन तालुक्यातील कारखान्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
आंदोलन मागे घेतल्याने मंगळवार (ता. ११) पासून ऊसतोडणी व वाहतूक गतीने सुरू झाली आहे. वाहतूक दरवाढीसाठी हे आंदोलन रविवार (ता. ९) पासून सुरू होते. सोमवारी झालेल्या वाहतूकदारांच्या बैठकीत दोन्ही तालुक्यातील बहुतांशी साखर कारखानदारांनी भाग घेतला.
शिरोळ येथे श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरती वाहनधारक व साखर कारखाना व्यवस्थापन यांच्यामध्ये दरवाढी संदर्भात बैठक झाली. त्यात वाहनधारकांनी अडचणी सांगितल्या. दरम्यान, बाजारातील साखरेच्या दरामुळे साखर उद्योगासमोर मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही बाब वाहनधारकांनी समजून घ्यावी, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले.
अखेर या बैठकीमध्ये नऊ टक्के वाहतूक दरवाढ देण्यावरती दोन्ही बाजूने सहमती दर्शविली. दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, शेती अधिकारी श्रीशैल हेगाणा, विजय जाधव, सी. एस. पाटील, जिल्हा ऊस वाहतुक संघटनेचे उपाध्यक्ष श्रीकांत गावडे, धनाजी पाटील नरदेकर, संभाजी जाधव, आदी उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.