ऊस उत्पादकांपासून कारखान्यापर्यंत सारेच चिंतातुर

ऊस उत्पादकांपासून कारखान्यापर्यंत सारेच चिंतातुर
ऊस उत्पादकांपासून कारखान्यापर्यंत सारेच चिंतातुर

कोल्हापूर : ऊस उत्पादकांच्या कोट्यवधी रुपयांच्या थकीत बिलांचा भार सोसणाऱ्या कारखान्यांना आता साखर विक्रीचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. साखरेच्या किमती कमी झाल्याने नैराश्‍येच्या गर्तेत कारखानदार गेले आहेत. २९०० रुपये क्विंटलनेसुद्धा साखर खरेदी करण्यास व्यापारी उत्सुक नसल्याने आता दररोज तयार होणारी साखर ठेवायची कुठे असा प्रश्‍न साखर कारखानदारांना पडला आहे. रोजचा गाळप अहवाल आणि त्यानुसार वाढणारा थकीत बिलांच्या रकमेने नामवंत कारखान्यांचीही झोप उडाली असल्याचे चित्र कारखाना पातळीवर आहे.  कारखान्यांचा हंगाम लगबगीचा असला तरी कोणत्याच कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान नसल्याचे चित्र कारखान्यांच्या ठिकाणी आहे. पाच ते सहा महिन्यांचे रखडलेले कर्मचाऱ्यांचे पगार. यामुळे अवस्था बिकट आहे. ऊस गाळप झाल्यानंतर जसा उसाचा रस तप्त होतोय तसेच तप्त मन कर्मचाऱ्यांचेही होतेय की काय, असा भास कारखान्यांवर होतो. पगार थांबल्याने रोजी रोटीही उसनवारीवर चाललेल्या कर्मचाऱ्यांकडे पाहिले की राज्याचा समृद्ध भाग इथेच आहे का, असा प्रश्‍न पडावा अशी येथील अवस्था. ऊस पाठवताना जी चिंता उत्पादकांच्या चेहऱ्यावर दिसते तीच चिंता कारखान्यांच्या हजारो कामगारांनाही सतावली आहे. ऊसतोडणीचा प्लॉट ते कारखाना कार्यस्थळ या प्रवासातील प्रत्येक घटक आता पुढे काय या चिंतेने ग्रासला आहे. सरकारी पातळीवरची अनास्था कारखान्यांच्या अध्यक्ष संचालकांना अस्वस्थ करते. तर दररोजच्या खर्चाची रकमेची तरतूद कोणत्या बाबीतून करायची याचा ताण कारखान्याचा कार्यकारी संचालक, अकाउंट ऑफिसवर येतो. हंगाम सुुरू असला तरी नियमित आखून दिलेल्य व्यवस्थेमुळे शेती विभाग, तांत्रिक विभागासह अन्य विभाग आपापले काम करीत असतात पण सध्या प्रसंगच बाका निर्माण झाल्याने दररोजच्या अडचणी सोडविण्यासाठी थेट कारखान्याच्या अध्यक्षालाच समन्वयाची भूमिका बजवावी लागत आहे. साखरेची नियमित विक्री त्यानंतर आलेली रक्कम, शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम, ती जमा करण्यासाठीची गडबड असे वातावरण पूर्ण हंगामात कारखान्यांच्या ठिकाणी असते. पण यंदाची परिस्थिती वेगळी आहे. अकाउंट विभाग फक्त देणी किती द्यावी लागतात याच हिशोबात आहे. तर कारखान्याचा कॅश विभाग तर जवळ जवळ बंदच पडल्यासारखी स्थिती आहे. यातच सरकारकडून थकीत एफआरपीप्रश्‍नी येणाऱ्या नोटिसा नव्याच समस्या उभ्या करतात. काही कारखान्यांना भेट दिली असता प्रत्येकाला चिंता लागून राहिली आहे. जोपर्यंत कुठेतरी ठोस आश्‍वासन मिळून परिस्थिती सुधरत नाही तो पर्यंत हा गाडा कसा चालवायचा हाच मोठा प्रश्‍न प्रत्येक घटकापर्यंत निर्माण झाला आहे. विविध भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांचे फोन अधिकाऱ्यांना अस्वस्थ करीत आहेत. प्रत्येकालाच पैशाची गरज आहे. ऊस पाठवून महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. उत्पादकांचा संयम सुटतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अपापल्या संबंधांनुसार उत्पादक विविध पद्धतीने कारखानदारांकडे पैशाची मागणी करीत आहे. पण हाती पैसा नसल्याने अध्यक्षांनाही केवळ ऐकून घेण्यापलीकडे कोणताच पर्याय उरला नसल्याचे चित्र आहे. एकूणच हा प्रश्‍न सुटायचा कसा का याचे उत्तर कोणाकडेही नाही. कारखान्यांतून निर्माण होणारी पांढरी शुभ्र साखर साखर पट्ट्यातील समृद्धता दाखविणारी, पण आता साखरेचा वाढणारा ढीग चिंता निर्माण करतोय.  ही साखर कशी आणि कुठे विकायची आणि रकमेची तरतूद करून हा उद्योग कसा सावरायचा हीच चिंता कारखान्याच्या प्रत्येक घटकाला लागून राहिली आहे. कारखान्यांचे अध्यक्ष ‘डिफेन्स’मूडमध्ये असल्याचे चित्र अनेक ठिकाणी आहे. जर वेळेत उपाय झाले नाहीत आणि थकबाकीचे ओझे कारखाना आणि शेतकरी दोघांची कोणती अवस्था करेल याची कल्पना सध्या तरी करणे अशक्‍य बनले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com