कोरोनाबाबत जनजागृतीसाठी ग्रामसभा घेण्याच्या सूचना

कोरोनाचा ग्रामीण भागात प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. त्यासाठी ग्रामविकास विभागाने दिलेल्या आदेशानुसार जागृतीसाठी ग्रामसभा घेतल्या जाणार आहेत. ग्रामसभांसाठी अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. - जगन्नाथ भोर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नगर
CORONA
CORONA

नगर : ‘कोरोना’ला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागात काय उपाययोजना करता येतील, लोकांचा सहभाग यात कास राहील, यावर चर्चा करून उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने आठवड्यातून एकदा ग्रामसभा घेऊन जनजागृती करावी, असे आदेश ग्रामविकास खात्याने दिले आहेत. ग्रामविकासच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी असा आदेश काढून तो जिल्हा परिषदांना कळवला आहे. नियोजनचा स्तर उच्च असल्याने सीईओ यांनी निरीक्षण पथके पाठवून खात्री करावी, असे  सांगण्यात आले आहे.    ‘कोरोना’ विषाणूचा राज्यात प्रादुर्भाव होऊ लागला आहे. देशात सर्वाधिक बाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यामुळे या आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी शाळा, महाविद्यालये यासह गर्दी जमणारी ठिकाणी बंद करण्याचे सरकारने आदेश दिले आहेत. ग्रामीण भागात अजून कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव होताना दिसत नाही. मात्र भविष्यातील चिंता पाहता आठवडे बाजार, यात्रा-जत्रा, लग्नसोहळे यासह गर्दी होईल असे कार्यक्रम करू नयेत, असे सांगतानाच ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत आढावा घेतला. त्यात ग्रामस्तरावर ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागात आठवड्यातून एकदा ग्रामपंचायतींनी गावात ग्रामसभा घेऊन लोकांना ‘कोरोना’ विषाणूसंदर्भात माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने आठवड्यातून एकदा ग्रामसभा घेण्याचा आदेश जारी करण्यात आला. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राधान्याने गावातील रस्ते, नाल्या स्वच्छ ठेवाव्यात, गावात कुठेही अस्वच्छता होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना आदेशात दिल्या आहेत. सांडपाणी व मलनि:सारण योजना राबविण्याची ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी स्पष्ट केले आहे. स्वच्छता समित्या स्थापन करा  गावपातळीवर स्वच्छता कायम ठेवण्यासाठी स्वच्छता समित्या कार्यरत असतात. मात्र अनेक ठिकाणी त्या समित्या केवळ कागदावरच आहेत. अनेक ठिकाणी समिती केलेल्या नाहीत. कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर गावपातळीवर स्वच्छता समित्या सक्रिय कराव्यात. जेथे समित्या नाहीत तेथे तातडीने समित्या कराव्यात. घनकचरा व्यवस्थापनाची योजना करून त्याच्या अंमलबजावणीचे  स्वरूप ग्रामसभेत मंजूर करून घ्यावेत. स्वच्छता समित्यांमार्फत स्वच्छतेचा आढावा घेण्यात यावा, अशा सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत. दरम्यान, वरिष्ठांनी आदेश देऊनही जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने अजूनही याबाबत फारशी दखल घेतल्याचे दिसत नाही. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यावर बोलायला तयार नाहीत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com