गुणवत्तापूर्ण निविष्ठांसाठी कटाक्ष ः सुहास दिवसे

कृषी आयुक्त
कृषी आयुक्त

औरंगाबाद: येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते कीटकनाशके मुबलक प्रमाणात व गुणवत्तापूर्ण मिळावीत, यावर कृषी विभागाचा कटाक्ष असेल, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्‍त सुहास दिवसे यांनी दिली. शुक्रवारी (ता. १०) मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील खरीप पेरणीपूर्व नियोजनाचा त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. श्री. दिवसे म्हणाले, की येत्या खरीप हंगामात कपाशीवरील गुलाबी बोंड अळीसोबतच प्रामुख्याने मका पिकावर आढळून आलेल्या फॉल आर्मी वर्मच्या आक्रमणाला नियंत्रित करण्यासाठी कृषी विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. ८० प्रकारच्या पिकांवर आपली उपजीविका करणाऱ्या फॉल आर्मी वर्मचे जीवनचक्र कसे भेदता येईल तिचे आक्रमण कसे रोखता येईल याविषयी शेतकऱ्यांना परिपूर्ण माहिती दिली जाणार आहे. राज्यात जवळपास १४ हजार शेतीशाळा घेतल्या जाणार असून विद्यापिठाचे तज्ज्ञ, कृषी विभागातील मास्टर ट्रेनर कृषी सखींना या शेतीशाळांमध्ये सामावून घेतले जाणार आहे. प्रत्येक विभागाचे वॉटरशेड, जमीन आणि पाण्याच्या उपलब्धता त्यानुसार पीक व खतांच्या शिफारशी करण्यात येणार आहेत.  ‘‘महावेधच्या माध्यमातून जवळपास ८० लाख शेतकऱ्यांपर्यंत आठवड्यातून दोन वेळा हवामानाचा अंदाज पोचविला जाणार आहे. येत्या १५ मे पासून साधारणपणे या कामाची सुरवात होणे अपेक्षीत आहे. कीड रोगांच्या प्रादुर्भावाची माहितीही ॲपच्या माध्यमातून जीआय मॅपिंगद्वारे त्यावर नियंत्रणाचे प्रयत्न केले जाणार आहेत. पिक विमा योजना जवळपास ७ वर्षांपासून राबविली जाते आहे. यंत्रणा व शेतकऱ्यांमध्ये विमा योजनेविषयी परिपूर्ण माहितीचा अभाव व सात वर्षात आलेल्या अडचणींचा विचार करून विमा योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीविषयी काम केले जाणार आहे. येत्या १३ व १४ मे ला नागपुरात राज्यस्तरीय प्रशिक्षणातून पीक विमा योजनेविषयी अधिकाऱ्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. पीक विमा योजनेच्या तक्रारींचे जिल्हा व विभागस्तरावर निराकरण होण्यासाठी तेथील कमिट्या सक्षम केल्या जातील,’’ असेही ते म्हणाले.  ‘‘महसूल, बॅंक, विमा कंपनीचा समन्वय साधून प्रकरणे निकाली काढली जातील. पीक कापणी प्रयोगाच्या वेळी कृषी विभागाचा एक अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहील, याविषयी कटाक्ष असेल. येत्या खरीप हंगामात बियाणे, खताचा तुटवडा राहणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यानुषंगाने जवळपास तीन बैठका कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत पार पडल्या. अनधिकृत वा बोगस बियाणे, खते, निविष्ठा शेतकऱ्यांना देऊन कुणी शेतकऱ्यांना फसवू नये यासाठी आजवर चार मोठ्या कारवाया करण्यात आल्या. त्याची धार अधिक तीव्र करण्यात येईल,’’ असेही दिवसे म्हणाले.  या वेळी औरंगाबादच्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील अधीक्षक कृषी अधिकारी साहेबराव दिवेकर, अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे, लातूरचे कृषी सहसंचालक तुकाराम जगताप यांची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com