उन्हाळी वरीची कोल्हापुरात लागवड

उन्हाळी नाचणीच्या प्रयोगानंतर आम्हाला आत्मविश्‍वास आला. यानंतर नावीन्यपूर्ण प्रयोगाचा पुढील टप्पा म्हणून आम्ही संस्थेच्या माध्यमातून ही लागवड करत आहोत. याचे प्रत्येक टप्प्यावरील निरीक्षण नोंदवणार आहोत. - सर्जेराव पाटील, अध्यक्ष, स्टेट मिलेट ऑर्गनायझेशन, कोल्हापूर
vari sowing
vari sowing

कोल्हापूर : स्थानिक अल्भूधारक शेतकऱ्यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या स्टेट मिलेट ऑर्गनायझेशन संस्थेच्या माध्यमातून पिसात्री (ता. पन्हाळा) येथे उन्हाळी वरी लागवडीचा राज्यातील पहिला प्रयोग करण्यात येत आहे. प्रयोगशील शेतकरी मिलिंद पाटील यांनी आपल्या शेतात साडेसहा गुंठ्यात उन्हाळी वरीची लागवड मंगळवारी (ता.२८) केली.  स्टेट मिलेट ऑर्गनायझेशन ही संस्था तालुक्‍यातील नऊ अल्पभूधारक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नुकतीच स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून भविष्यात बाजरी, नाचणी, वरी, राजगिरा, सावा, बर्टी आदि प्रकारच्या लघुतृणधान्याचे बीजोत्पादन, उत्पादन व मार्केटिंगचे काम केले जाणार आहे.  गेल्या वर्षी आत्माच्या माध्यमातून पन्हाळा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उन्हाळी नाचणी उत्पादनाचा यशस्वी प्रयोग केला होता. यानंतर तालुक्‍यातील पिसात्री, किसरुळ व परिसरातील काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाळ्यात घेतली जाणारी पिके उन्हाळ्यात करण्याबाबत चर्चा झांली. या तृणधान्यांना चांगले दर असल्याने उन्हाळ्यातही याचे उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना ते फायदेशीर ठरेल असा उद्देश ठेवून किसरुळ येथील प्रगतिशील शेतकरी सर्जेराव पाटील, पिसात्रीचे मिलिंद पाटील यांच्यासह काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली. उन्हाळी हंगामात लघुतृणधान्य कुठे घेतले जात नसल्याने या शेतकऱ्यांनी हे आव्हान पेलून हे तृणधान्य उत्पादित करण्याचे ठरविले. याच उपक्रमाचा भाग म्हणून वरीची लागवड करण्यात आली आहे. या पिकासाठी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून डिसेंबरमध्ये बियाणे आणून रोपे तयार करण्यात आली आहेत. फुले एकादशी हे वाण शेंडा पार्क येथील संशोधन केंद्राकडून घेण्यात आले आहे. उत्पन्नाचा तपशील समजण्यासाठी प्रत्येक गुंठ्याचा एक प्लॉट तयार करण्यात आला असून यानुसार व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात आले आहे.  संस्थेचे सचिव असलेल्या मिलिंद पाटील हे पन्हाळा तालुक्‍यातील प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी आजरा घनसाळ, जोंधळा, काळा जिरगा तांदूळ आदिंचे उत्पादन घेतले आहे. याचबरोबर गावठी भोपळा, दोडके, घेवडा, काकडी आदि भाजीपाल्यांच्या बियाणांचे संकलनही करतात. काटे भेंडी, गवार, जवारी, वरणा आदिची पिके सेंद्रिय पद्धतीने घेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयोगातील पुढचा टप्पा म्हणून त्यांनी पारंपरिक सूर्यफूल न लावता नावीन्यपूर्ण प्रयोग म्हणून उन्हाळी वरीची लागवड केली आहे.  प्रतिक्रिया कोल्हापूरचा पश्‍चिम भाग हा तृणधान्यासाठी महत्त्वाचा भाग आहे. पावसाळ्यातच घेतल्या जाणाऱ्या या पिकांकडे इतर हंगामात कुणी फारसे लक्ष दिले जात नाही. नियोजनाने पीक घेतल्यास उन्हाळ्यातही ही पिके येऊ शकतात यामुळे आव्हान पत्करून मी याची लागवड शेतात केली आहे. - मिलिंद पाटील, शेतकरी ९०४९६६०७०० ‘आत्मा’च्या माध्यमातून आम्ही या प्रयोगाला प्रोत्साहन दिले. उन्हाळी वरी च्या लागवडीचा प्रयोग देशात कुठेच आढळत नाही. यामुळे या शेतकऱ्यांनी पारंपरिकता बाजूला ठेवून स्वीकारलेले आव्हान कौतुकास्पद आहे. इतर शेतकऱ्यांनाही या प्रवाहात घेऊन याची व्याप्ती वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येईल.  - पराग परीट , तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, पन्हाळा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com