धानोरा- भोगाव (जि. हिंगोली) येथील दादाराव राऊत आठ वर्षांपासून शंभर टक्के सेंद्रिय शेती करीत आहेत. बारमाही भाजीपाला उत्पादन, प्रक्रिया करून हळद, मिरची पावडर व डाळींची निर्मिती करून सेंद्रिय प्रमाणीकरणाद्वारे त्यांचीही थेट विक्री साधण्यात त्यांना यश आले आहे. आरोग्यदायी अन्नाच्या निर्मितीबरोबर मातीची सुपीकताही त्यांनी जपली आहे. धानोरा- भोगाव (ता. वसमत, जि. हिंगोली) येथील दादाराव चंद्रभान राऊत यांची सिद्धेश्वर धरणाच्या कालव्याच्या लाभक्षेत्रात १२ एकर काळी-भारी जमीन आहे. सिंचनासाठी विहीर तसेच धरण भरल्यास कालव्याचे पाणीही सिंचनासाठी मिळते. राऊत यांची शेतीपद्धती|
पीक पद्धती
सेंद्रिय शेतीचा अंगीकार कृषी विभागातर्फे स्थापन केलेल्या सेंद्रिय शेती गटात राऊत सहभागी झाले, रासायनिक निविष्ठांच्या अनियंत्रित वापरामुळे मानवी आरोग्य व मातीवर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत माहिती मिळाली. त्यानंतर सेंद्रिय शेतीचा अंगीकार केला. एकूण क्षेत्रापैकी सहा एकरांत सेंद्रिय शेती तर उर्वरित सहा एकरांत रासायनिक निविष्ठांचा कमीतकमी वापर होतो. येत्या काळात संपूर्ण क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्याचा मानस.
हळद पावडरनिर्मितीतून मूल्यवर्धन हळदीच्या सेलम या वाणासोबतच कुरकुमीनचे प्रमाण अधिक असलेल्या प्रतिभा वाणाचे उत्पादन
घरगुती गिरणीवर डाळनिर्मिती
कामांची जबाबदारी शेतकामासाठी सालगडी आहे. स्वतः राऊत आणि पत्नी सुनंदा देखील शेतीत मेहनत करतात. त्याचबरोबर प्रक्रिया उद्योगाचीही सारी कामे करतात. वसमत येथे वास्तव्यास असलेला मुलगा योगेश विक्री व्यवस्था सांभाळतो. निविष्ठा निर्मिती एक बैलजोडी, दोन गायी आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक निविष्ठा निर्मितीसाठी शेण, गोमूत्र उपलब्ध होते. दशपर्णी अर्क, जीवामृत, गांडूळ खत, बायाडायनाॅमिक्स खत तयार केले जाते. दरवर्षी एकूण सुमारे १० ते १२ टन खताची निर्मिती होते. सेंद्रिय शेती ठरली फायदेशीर सेंद्रिय शेतीमुळे मातीची सुपीकता वाढली आहे. घरी खाण्यासाठी सत्वयुक्त अन्न तयार झाले आहे. प्रक्रिया उद्योगातून या शेतमालाचे मूल्यवर्धन केले आहे. स्वतःची विक्री व्यवस्था असल्याने नफ्यात वाढ झाली आहे. भाजीपाला व प्रक्रिया उत्पादनांतून मासिक उत्पन्न वाढले आहे. सेंद्रिय शेतीतून पिकांच्या एकरी उत्पादनात कोणतीही घट झाली नसल्याचे राऊत म्हणाले. रासायनिक शेतीतील सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा आदी मालांची विक्री बाजार समितीत होते. आज शेतीतील उत्पन्नातून राऊत यांनी शेतात पक्के बांधकाम तसेच जनावरांसाठीही निवारा बांधला आहे. मुलांच्या उच्च शिक्षणासाठीही खर्चाची सोय करणे शक्य झाले आहे.
सेंद्रिय भाजीपाला उत्पादन सेंद्रिय पद्धतीने भेंडी, गवार, चवळी, शेपू, पालक, वांगी, टोमॅटो, वाल, मेथी, कोथिंबीर, कारले, दोडके आदी पिके घेण्यात येतात. ग्राहकांना वर्षभर हा आरोग्यदायी भाजीपाला घरपोच मिळण्याची सोय केली आहे. बाजारपेठेतील शेतमालाच्या किंमतीतील चढ उताराचा फटका शक्यतो बसत नाही. फळभाज्यांना ६० रुपये प्रतिकिलो असा निश्चित दर ठेवला आहे. बाजारपेठांतील दरांपेक्षा पालेभाज्यांची विक्री केवळ दोन रुपये जास्तीने होते. ग्राहकांचा बनविला व्हाॅट्सॲप ग्रुप राऊत आणि वसमत तालुक्यातील दोन सेंद्रिय उत्पादक शेतकरी यांनी एकत्र येऊन उत्पादनांच्या मार्केटिंगगसाठी सेंद्रिय ग्राहक मंडळ नावाचा व्हॅाटसॲप ग्रुप तयार केला आहे. त्यात वसमत शहरातील सुमारे ८५ ग्राहकांचा समावेश आहे. ग्रुपवर दररोज सेंद्रिय उत्पादनांविषयी माहिती शेअर केली जाते. त्यानुसार ग्राहक मागणी करतात. त्यानुसार भाजीपाला व प्रक्रिया उत्पादने घरपोच पोचवली जातात. ग्रुप वर अन्य कोणत्याही पोस्ट टाकण्यास मनाई आहे. संपर्कः दादाराव राऊत, ९९६०६८६१७१
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.