मगर-चौगुले समितीचा घोटाळ्याचा गोपनीय अहवाल दडपला

मृद्‌संधारण
मृद्‌संधारण

पुणे: कृषी खात्याच्या सिमेंट नालाबांध कामात झालेल्या घोटाळ्याचा गोपनीय अहवाल काही अधिकाऱ्यांनी दडपला आहे. पुण्याचे तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व विद्यमान मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुभाष काटकर यांच्यावर या अहवालात ठपका ठेवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.  मृद्‌संधारण घोटाळ्यांच्या चौकशांबाबत राज्य शासनाने कडक भूमिका घेतली आहे. विशेषतः एकनाथ डवले यांची जलसंधारण सचिवपदी बदली झाल्यानंतर मृद्‌संधारणातील सोनेरी टोळ्या अस्वस्थ झाल्या. आता श्री. डवले कृषी सचिव म्हणून कार्यरत झाल्यामुळे या टोळीची आणखी कोंडी झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

शासनाने घेतलेल्या कडक भूमिकेनुसार कृषी आयुक्तालयाला दिलेल्या आदेशात बीडच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यासह (एसएओ) सर्व दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंग कारवाई करण्याचे आदेश दिले होते. ‘कारवाईचा प्रस्ताव तत्काळ मंत्रालयात पाठवा’ असे आदेश काही दिवसांपूर्वी देणाऱ्या शासनाने पुण्याच्या घोटाळ्याबाबत कोणतीही पावले टाकलेली नाहीत. सिमेंट नाला बांधकामामध्ये कृषी खात्याने मलिदा लाटल्याच्या तक्रारी आल्यानंतर मृदसंधारण उपसंचालक बी. एन. मगर आणि तंत्र अधिकारी बाळासाहेब चौगुले यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीचा अहवाल कोणी दडपला, अशी चर्चा आता कृषी आयुक्तालयात सुरू आहे. बीडच्या ‘एसएओ'विरोधात कारवाईची तत्परता दाखविणारे शासन पुण्याच्या 'एसएओ'च्या घोटाळ्याबाबत संभ्रमात का आहे? घोटाळ्याचा स्पष्ट अहवाल असतानाही कारवाईबाबत शासन गप्प का बसले? असे सवाल आता मृदसंधारण विभागातील कर्मचारी उपस्थित करीत आहेत.  शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याचे कारण दाखवून पुणे जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचे सिमेंट नालाबांध कृषी विभागाने बांधले आहेत. नालाबांधमुळे शेतकरी किती समृद्ध झाले हे स्पष्ट होत नसले तरी अधिकारी मात्र मालामाल झाले आहेत, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कृषी विस्ताराची कामे सोडून कृषी अधिकारी मृदसंधारणाची कामे करतात. ही कामे पूर्णतः जलसंधारण विभागाकडे सोपविणे गरजेचे आहे, असे या विभागाचे म्हणणे आहे ‘मगर-चौगुले समितीचा अहवाल मंत्रालयात पाठविण्यात आलेला नाही. मृदसंधारण संचालकांना देण्यात आलेला हा अहवाल सध्या कोणाच्या कपाटात धूळ खात पडला आहे याविषयी आम्हाला माहिती नाही,’’ असेही जलसंधारण विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.  दरम्यान, मगर-चौगुले समितीच्या गोपनीय अहवालात पहिलेच नाव तत्कालीन ‘एसएओ’ सुभाष काटकर यांचे आहे. केवळ एका उपविभागाच्या उघड झालेल्या घोटाळ्यात ७९ लाख रुपयांची वसुली काढण्यात आल्याचे अहवालातून स्पष्ट होते. ‘‘सिमेंट नालाबांध कामाच्या गैरव्यवहाराला नियंत्रण अधिकारी म्हणून श्री. काटकर हे जबाबदार आहेत. त्यांच्याकडून २६ लाख रुपये वसूल करण्यात यावेत,’’ असा उल्लेख या अहवालात आहे.  तत्कालीन ‘एसएसओ’ श्री. काटकर यांची या अहवालावर अधिक चौकशी न करण्याचा निर्णय घेणे व त्यांना राज्याच्या मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी म्हणून मोक्याच्या जागी पाठविणे, असे दोन महत्त्वाचे निर्णय आयुक्तालयात कोणी घेतले असे सवाल उपस्थित केले जात आहेत.  सामान्य असल्यास नोकरी जाते, वरिष्ठ असल्यास बढती मिळते कृषी खात्यातील अधिकारी व कर्मचारी मात्र मगर-चौगुले समिती अहवालाच्या झालेल्या फेकाफेकीवर नाराज आहेत. ‘‘साध्या कर्मचाऱ्याने चूक केल्यावर त्याला नोकरीतून काढतात आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना घोटाळा उघड झाल्यानंतरदेखील बढत्या मिळतात,’’ अशा शब्दांत मृद्‌संधारण विभागातील कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com