कोल्हापूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या संघटनेचे बारसे आज (ता.२१) कोल्हापुरात होणार आहे. यानंतर दसऱ्यादिवशी इचलकरंजी येथे मेळावा होणार असून त्यात संघटनेची ध्येयधोरणे स्पष्ट करण्यात येणार आहेत.
स्वाभिमानीची ऊस परिषद ऑक्टोबरमध्ये होणार असून, या परिषदेच्या तोडीस तोड हा मेळावा करण्यासाठी या संघटनेच्या वतीने जोरदार प्रचार अभियान राबविण्यात येत आहे. ऊस दर कोणता मागायचा याबाबतची घोषणा याच मेळाव्यात होणार असल्याने आता ऊसदरासाठी लढणाऱ्या या नव्या संघटनेकडे लक्ष लागले आहे.
श्री. खोत यांनी दोन दिवसांपूर्वीच स्वाभिमानीचे प्राबल्य असणाऱ्या गावांना भेट देत स्वाभिमानीबाबत नाराज असणाऱ्या कार्यकर्त्यांचा धांडोळा घेतला.
विशेष म्हणजे त्यांनी स्वाभिमानीला कट्टर विरोध करणाऱ्या काही नेत्यांचीही भेट घेऊन त्यांना आपल्यासोबत येण्याचा आग्रह केला. अनेक नेत्यांशी बंद खोलीत चर्चा करून शेट्टीच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले.
श्री. खोत यांनी कार्यकर्त्याची जुळवाजुळव करताना कोणतेही नियम ठेवले नाहीत. जे जे लोक अनुकूल असतील त्यांची भेट घेण्याचे नियोजन केले आहे. श्री. खोत यांनी ज्या गटांच्या भेटी घेतल्या आहेत. ते गट त्यांच्याबरोबर रहातील का, याबाबत सध्या तरी भाष्य करणे अवघड असले तरी चाचपणी करून स्वाभिमानीचे प्राबल्य असणाऱ्या गावात स्वाभिमानीच्या विरोधात बोलण्याचे काम श्री. खोत करीत आहेत.
अनेक कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांची भेटही श्री. खोत यांनी घेतली आहे. यामुळे या संघटनेची नेमकी काय भूमिका असेल, याबाबत उत्सुकता आहे.
नव्या संघटनेची आज घोषणा
घटस्थापनेच्या मुहूर्तावर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आज (ता. २१) येथे नव्या संघटनेच्या नावाची घोषणा करणार आहेत. दुपारी एक वाजता येथील शाहू सांस्कृतिक हॉल येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते याबाबतची घोषणा करतील.