..तर मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश’ यात्रे विरोधात 'जनआक्रोश' यात्रा काढू : स्वाभिमानीचा इशारा

जनआक्रोश यात्रा काढण्याचा स्वाभिमानीचा इशारा
जनआक्रोश यात्रा काढण्याचा स्वाभिमानीचा इशारा

पुणे : सत्ताधारी भाजपकडून काढल्या जाणाऱ्या ‘महाजनादेश’ यात्रेच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ‘जनआक्रोश’ यात्रा काढण्याचा इशारा दिल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या गप्पा ठोकण्याआधी माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत,’ असे आव्हान शेट्टी यांनी दिले.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “महाजनादेश यात्रा काढणारे मुख्यमंत्री आमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळतात. आता उत्तरे न दिल्यास महाजनादेश यात्रेपाठोपाठच राज्यात मला जनआक्रोश यात्रा काढावी लागेल. बिल्डरांकडून वसूल केलेल्या दहा हजार कोटींच्या ठेवी बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे जमा झाल्या. त्यातील किती पैसे तुम्ही खर्च केले आणि त्यामधून कुणाचे कल्याण झाले, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. बांधकाम कामगारांचा अजूनही किड्या-मुंग्यांसारखा मृत्यू होत असताना सरकारने काहीही केलेले नाही.” 

“मुळात पीकविम्यामध्ये झालेल्या गैरव्यवहाराबद्दल मी स्वतः दीड वर्षापूर्वी पुराव्यासहीत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. संबंधित विमा कंपनी व त्या कंपनीस सहकार्य करणाऱ्या कृषी व महसूल विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान होऊ नये म्हणून काय दक्षता घेतली, इर्डा अर्थात आयआरडीएकडे किती शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या व त्याचे पुढे काय झाले, याचा मुख्यमंत्री या नात्याने फडणवीस यांनी आढावा घेतला काय,” असा सवाल शेट्टी यांनी केला. 

मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाने उसाचा उत्पादन खर्च सन २०१६-१७ तुलनेत ३२ हजाराने कमी असल्याचा अहवाल केंद्र सरकारकडे दिलेला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही हे सांगणार काय, असा सवाल करीत शेट्टी म्हणाले की, “मंत्रिमंडळातील आपले सहकारी सुभाष देशमुख, तानाजी सावंत, पंकजाताई मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच ऊस उत्पादकांचे पैसे थकविले आहेत. यावर फारसे मनावर घेऊ नका, असेही तुम्ही ऊस उत्पादकांना सांगणार आहात काय? कर्तृत्वान कृषी खात्याने एचटीबीटी बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई केलेली नाही.”

तुरुंगाऐवजी भाजपत प्रवेश कसा दिला जातोय? “पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना साखर कारखान्यांतील आर्थिक घोटाळे व सिंचन घोटाळे करणाऱ्यांच्या विरोधातील गाडीभर पुरावे फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना दिले होते. चव्हाण सरकारने काहीच कारवाई केली नाही. मात्र, सरकार आल्यास त्या सर्वांना तुरुंगात टाकण्याची भाषा मुख्यमंत्री करीत होते. आता ते विसरले असून तुरुंगाऐवजी बहुतेकांना भाजपत प्रवेश दिला जात आहे. उरलेल्यांना ‘इनकम टॅक्स’ व ‘ईडी’ची भीती दाखविली जात आहे,” अशी टीका माजी खासदार शेट्टी यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com