बुलडाणा : पीकविम्याच्या मुद्यावर चिखलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहा दिवस ठिय्या आंदोलन केले. सोमवारी (ता.१७) सर्वांनी मुंडण करीत आक्रमक आंदोलन केले. त्यानंतर सायंकाळी अधिकाऱ्यांनी धावपळ करीत शेतकऱ्यांना विमा भरपाईसह इतर मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने निधी जमा केला जाणार आहे. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न देता केवळ घोषणा करीत विमा कंपनीने विम्याची रक्कम टाळली होती. या विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, सतीश सुरडकर, प्रल्हाद देव्हडे, रामेश्वर चिकणे, आशू जमदार यांच्यासह शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले होते.
तब्बल सहा दिवस चाललेल्या या आंदोलनाची दखल प्रशासनासह विमा कंपनीच्या वरिष्ठांनी सुद्धा घेतली नव्हती. त्यामुळे या आंदोलनात रविकांत तुपकर उतरले व त्यांनी भेट देऊन स्वत:सह ५० कार्यकर्त्यांनी मुंडण करीत प्रशासनाचा निषेध नोंदविला.
शेतकऱ्यांचे केस पार्सलद्वारे विमा कंपनी व कृषी आयुक्तांना पाठवण्याचे जाहीर केले. त्यानंतर कृषी खात्याच्या वरिष्ठांनी दखल घेत उपोषणस्थळी भेट दिली. कंपनीने खात्यात पैसे जमा करेल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.