स्वतंत्र भारत पक्षाकडून ‘आपले सरकार’चा निर्धार

स्वतंत्र भारत पक्षाचा ‘आपले सरकार’चा निर्धार
स्वतंत्र भारत पक्षाचा ‘आपले सरकार’चा निर्धार

नगर : राज्यात आणि देशात शेतकऱ्यांची लूट करणारे सरकार बदलून पाहिले, माणसे बदलली, पक्ष बदलले, मात्र लूट सुरूच राहिली. शेतकरी आत्महत्या थांबण्याएेवजी वाढल्या. त्यामुळे आता आपणच ‘आपले सरकार’ आणणार आहोत. समविचारी पक्षांना सोबत घेऊन आपले सरकार आणण्यासाठी आजपासून कामाला लागा'' असे आवाहन करत शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना राजकीय आखाड्यात उतरणार असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे अर्थवाद स्वीकारणारे राज्यातील छोटे पक्ष एक करून त्यांचे नेतृत्व शेतकरी संघटनेचा ‘स्वतंत्र भारत पक्ष’ करेल असेही स्पष्ट केले. शेतकरी संघटनेच्या या घोषणेने शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर सातत्याने बोलून मते मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्यातील अनेक राजकीय नेत्यांची आणि पक्षांची गोची होणार आहे. राज्यात आणि देशात लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वारे आतापासून वाहू लागले आहे. प्रत्येक बाबीत ‘शेतकरी आणि शेतीप्रश्‍न’ एवढेच मुद्दे चर्चिले जात आहेत. असे असताना सत्ताधारी आणि विरोधक शेतकरीविरोधी भूमिका घेत आहेत, असा जाहीर आरोप शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केला. शेतकरी संघटनेचे शिर्डी (जि. नगर) येथे १४ वे संयुक्त अधिवेशन झाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष होते. राज्यभरातील शेतकरी, शेतकरी नेते, कार्यकर्ते आणि देशभरातील शेतकरी नेते अधिवेशनाला आले होते. भाजप धर्मवादावर तर काॅँग्रेस निधर्मवादावर निवडणुका लढू पाहत आहे. याने मात्र शेतकऱ्यांचे भले होणार नाही. त्यासाठी ‘संघटनेचे प्रतिनिधी विधानसभेत गेल्याशिवाय प्रश्‍न सुटणार नाहीत,’ असे सांगून शेतकरी संघटना आता ‘आपले सरकार’ आणणार असल्याचे स्पष्ट केले.  कृषी धोरण आणि अर्थवादाच्या मुद्यावर जो पक्ष बोलेल त्याच्यासोबत असू असे स्पष्ट करताना निवडणुकात समविचारी आणि ज्यांना कृषी धोरण आणि अर्थवादाचे मुद्दे योग्य वाटत असेल अशा छोट्या पक्ष, संघटनांना बरोबर घेऊन शेतकरी संघटनेचा ‘स्वतंत्र भारत पक्ष’ नेतृत्व करेल. विदर्भात विदर्भावाद्यासोबत असा प्रयोग केल्याचे सांगितले. विधानसभा, लोकसभेच्या नेमक्‍या किती जागा लढवणार हे स्पष्ट केले नसले तरी पंधरा विधानसभेच्या जागांवर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट, माजी आमदार वामनराव चटप, गोविंद जोशी, सरोद काशीकर, अनिल चव्हाण, बापुराव आढाव आदीसह प्रमुख नेत्यांनी दावा केला आहे. शेतकरी संघटना पूर्ण ताकदीने आगामी निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचे स्पष्ट झाल्याने राजकीय क्षेत्रातील लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीचा पुन्हा प्रयत्न करू राज्यातील सर्व शेतकरी संघटना एकत्र आल्या तर राजकीय पक्षांचे अस्तित्व उरणार नाही याची राज्याला जाणीव आहे; पण अनेकवेळा प्रयोग करूनही संघटना एक झाल्या नाहीत. आता देशात आणि राज्यात शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी महत्त्वाच्या धोरणावर निवडणुका व्हाव्यात. त्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन लढा द्यावा यासाठी ‘एकीचा पुन्हा एकदा प्रयत्न करू. बरोबर आले तर ठिक, नाही तर त्यांच्याविना पुढे जाऊ’ शेतकरी संघटनेच्या प्रमुख नेत्यांनी अधिवेशात स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com