'ताकारी' योजनेचे पाणी कालव्यातून लागले वाहू

वांगी, जि सांगली ताकारी सिंचन योजना सुरु झाल्याने मुख्य कालव्यातून पाणी वाहू लागले आहे (छायाचित्र रवि मोहिते)
वांगी, जि सांगली ताकारी सिंचन योजना सुरु झाल्याने मुख्य कालव्यातून पाणी वाहू लागले आहे (छायाचित्र रवि मोहिते)

सांगली : कडेगावसह खानापूर आणि तासगाव तालुक्‍याला सुजलाम-सुफलाम करणारी ताकारी उपसा जलसिंचन योजना गेल्या तीन दिवसांपासून सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ताकारी सिंचन योजनेचे पाणी राजकीय श्रेयवादात तीन महिने अडकले होते. लाभक्षेत्रातील सर्वच पिकांची अक्षरशः होरपळ झाली. प्रमुख पीक असलेले ऊसक्षेत्र वाळून चिपाडे झाली. विविध संघटनांनी आंदोलने केली. तरीही पाटबंधारे विभागाने पाणी सोडले नाही. या योजनेची एकूण १० कोटी ३७ लाख वीजबिल थकबाकीपैकी निम्मे भरल्याशिवाय वीज न जोडण्याची भूमिका महावितरणची होती.

शासनाने टंचाईनिधीचे ४ कोटी ७१ लाख अडविले होते. शिवाय काही साखर कारखानदारांनी गतवर्षी शेतकऱ्यांची कपात केलेली पाणीपट्टीची दीड कोटीची रक्कम पाटबंधारेला दिलीच नव्हती. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार अनिल बाबर, आमदार मोहनराव कदम यांची बैठक झाली.

या बैठकीत भागातील ५ साखर कारखान्यांनी ५ कोटी भरून योजना सुरू करण्याचे ठरले. त्यानुसार रक्कम जमा करून महावितरणला भरली. यानंतर महावितरणने उरलेल्या ५ कोटीबद्दल प्रश्न निर्माण केला. त्यावर पाटबंधारेही हतबल झाले. त्यासाठी मुंबईत मंत्रालयात महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यावर तोडगा काढला. त्यानुसार महावितरणच्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना तीन दिवसापूर्वी दुपारी आदेश आल्यानंतर वाजता वीज जोडणी झाली.

टप्पा १ साटपेवाडी बंधाऱ्यातून दोन पंपाद्वारे पाणी उचलून टप्पा २ सागरेश्वर संतुलन जलाशयात पाणी सोडले गेले. कृष्णा नदीत कोयना धरणातून २ हजार क्‍यूसेक प्रतीसेकंद प्रमाणे पाणी सोडण्यात आले असून ते साटपेवाडी बंधाऱ्यात पोहोचले आहे. ताकारीच्या पाण्याने देवराष्ट्रे ओलांडून ७ कि.मी.वरील मोहित्यांचे वडगाव परिसरात प्रवेश केला आहे. टप्पा २ वरील आणखी दोन पंप सुरू केले. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाची गती वाढली आहे. पाण्यामुळे वाळलेले ऊस क्षेत्र जीवंत होणार नसले तरी काही प्रमाणात रब्बी पिकांना आणि पिण्याच्या पाण्यासाठी निश्‍चित लाभ होणार आहे.

ताकारी सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे. सोडण्यात आलेले पाणी गरज असलेल्या लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांचे पूर्ण समाधान होईपर्यंत बंद केले जाणार नाही. - प्रकाश पाटील, कार्यकारी अभियंता ताकारी सिंचन योजना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com