वांगी, जि. सांगली : ताकारी योजना सुरू होऊन मुख्य कालवा भरून वाहत आहे. मात्र, अस्तरीकरणामुळे गळती आणि पाणी मुरण्याचे प्रमाण शून्य झाले असल्याने वांगी (ता. कडेगाव) परिसरातील सर्वच ओढे-नाले कोरडे ठणठणीत पडले आहेत. विहिरींच्या पाणीपातळीत किंचितही वाढ होत नाही. या प्रकाराने पाणीटंचाई सतत भासण्याची शक्यता शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. सुमारे २० वर्षांपासून ताकारीच्या पाण्याने जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, पलूस आणि तासगाव तालुक्यांना दर वर्षी दिवाळीपासून सलग सहा महिने भरपूर पाणी पुरवून सुजलाम्-सुफलाम् केले आहे. योजनेतून दर दीड महिन्यांनी येणाऱ्या पाण्याबरोबरच लाभक्षेत्रातील सर्वच ओढ्यावरून होणाऱ्या पाण्याच्या गळतीने ओढा काठावरील सर्व विहिरी पुढील महिनाभर जिवंत राहत असत. मात्र पाटबंधारेच्या धोरणानुसार मुख्य कालवा संपूर्ण अस्तरीकरण होत आहे. सध्या हे काम वांगी परिसरांतील २/३ ओढ्यावर पूर्ण झाल्याने वांगीतील एकाही ओढ्याला सध्या पाणी नाही. परिणामी ओढाकाठावरील सुमारे २०० विहिरी कोरड्या आहेत. ताकारी आवर्तन बंद झाल्यावर पिकांना पाणी कुठले द्यायचे? या चिंतेने सर्व शेतकरी धास्तावले आहेत. उन्हाळभर पिके कशी जगवायची अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. यातून तत्काळ मार्ग निघून ओढापात्रातून पाणी वाहील याची शाश्वती नसल्याने बागाईत क्षेत्र वाळण्याची भीती आहे. अस्तरीकरणापूर्वी यावर तोडगा निघणे अपेक्षित होते. मात्र संभाव्य धोक्याची कल्पना न आल्याने शेतकरी आणि पाटबंधारे विभाग बिनधास्त राहिले.
प्रतिक्रिया अस्तरीकरणामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण क्षीण झाले असून, ओढापात्रातून पाणी वाहिल्यास त्याचा शेतीला दीर्घकाळ उपयोग होतो. त्या दृष्टीने संबंधित शाखा अभियंत्यांना सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ओढापात्र कोरडे राहणार नाहीत याची काळजी पाटबंधारे विभाग घेईल. -राजन डवरी, कार्यकारी अभियंता, ताकारी योजना
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.