सेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा ः राहीबाई पोपेरे

रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने पुढील पिढी चांगली जन्माला येण्यासाठी आपल्या काळ्या आईचे आरोग्य जपले पाहिजे. त्यातूनच चांगला समाज निर्माण होईल. सेंद्रिय शेतीचा विस्तार होण्यासाठी येणाऱ्या काळात प्रत्येकाने पुढे आले पाहिजे, असे आवाहन बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी केले.
Take care of the health of black mothers through organic farming: Rahibai Popere
Take care of the health of black mothers through organic farming: Rahibai Popere

नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने पुढील पिढी चांगली जन्माला येण्यासाठी आपल्या काळ्या आईचे आरोग्य जपले पाहिजे. त्यातूनच चांगला समाज निर्माण होईल. सेंद्रिय शेतीचा विस्तार होण्यासाठी येणाऱ्या काळात प्रत्येकाने पुढे आले पाहिजे, असे आवाहन बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी केले. 

‘रेसिड्यू फ्री अँड ऑरगॅनिक मिशन इंडिया’ यांच्या वतीने बुधवारी (ता. २२) सह्याद्री फार्म, नाशिक येथे राज्यस्तरीय सेंद्रिय शेती परिसंवादाच्या उद्‍घाटन सत्रात त्या बोलत होत्या. या वेळी अन्नमाता ममता भांगरे, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती विभाग प्रमुख डॉ. उल्हास सुर्वे,  सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, नवनिर्माण न्यासच्या वसुधा सरदार यांची उपस्थिती होती. 

राहीबाई म्हणाल्या, की येणारी पिढी सशक्त ठेवण्यासाठी सेंद्रिय शेतीची चळवळ वाढली पाहिजे. त्यासाठी बियाणे संवर्धित केल्यास स्वयंपूर्णता येईल.‘जुनं ते सोनं’ हे स्वीकारून प्रत्येक गावात पैशाच्या बँकेप्रमाणे देशी बियाण्याची बँक तयार झाली पाहिजे.

कौसडीकर म्हणाले, की शेतकऱ्याचा मुख्य भांडवल हे जमीन आहे. त्यामुळे जोपर्यंत जमीन चांगली नाही तोपर्यंत आपला व्यवसाय चांगला होऊ शकत नाही. शेतातून दर्जेदार शेतीमालाचे उत्पादन आलेच पाहिजे. त्यासाठी सेंद्रिय शेती हे मूळ आहे. संतुलित आहार ही काळाची गरज असल्याने, मानवी रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी जमिनीचे आरोग्य राखले पाहिजे. येणाऱ्या काळात रासायनिक खतांच्या भरवशावर शेती होऊ शकत नाही. सेंद्रिय शेतीत कमी खर्चाचे पर्याय असून, त्याचा अभ्यास केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 

चार सत्रांत सेंद्रिय परिसंवाद पार पडला. ‘सेंद्रिय शेती अन्नद्रव्य व सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन’ विषयावर डॉ. कौसडीकर, प्रदीप कोठावदे यांनी मार्गदर्शन केले. ‘सेंद्रिय शेतीत कीड-रोग व तणनियंत्रण’ विषयावर कृषी उद्योजक रामनाथ जगताप, डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. संतोष चव्हाण व ‘ॲग्रोवन’चे मंदार मुंडले यांनी मार्गदर्शन केले. ‘प्रमाणीकरण’संबंधी संजय देशमुख, सुजित कैसरे, डॉ. प्रशांत नाईकवाडी व हर्षल जैन यांनी तर ‘उत्पादन, बाजारपेठ व प्रक्रिया उद्योग’ विषयावर विलास शिंदे, वसुधा सरदार, स्वाती शिंगाडे व सचिन पालकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी सेंद्रिय शेतीसाठी योगदान देणारे तज्ज्ञ, शेतकरी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही ः शिंदे  भारतात ९० टक्के शेतकरी तोट्याची शेती करतोय. त्यास उत्पादने विक्री अडचणी, शासकीय धोरणे, प्रक्रिया संधी अभाव व निसर्ग अशी अनेक कारणे आहेत. त्यासाठी पर्याय शोधावे लागतील. अन्न सुरक्षित असले पाहिजे, यात दुमत नाही. मात्र शेती ती फायदेशीर झाली तरच तरुण पिढी पुढे येईल. ब्रँडच्या माध्यमातून ओळख व विश्‍वासार्हता महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी सामूहिक पातळीवर संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही, असे विलास शिंदे यांनी नमूद केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com