पुणे : नव्या केंद्रीय कृषी कायद्यांचा परिणाम म्हणून बाजार समित्या संदर्भहीन होणार आहेत. त्यामुळे, शेतकरी, अडते, हमाल, बाजार समिती कर्मचारी आदी बाजार समितीचे घटक रस्त्यावर येणार आहेत. म्हणून उद्या रस्त्यावर फेकले जाऊन बरबाद होण्यापेक्षा आजच हे कायदे आपल्या राज्यात तरी लागू होऊ नयेत. यासाठी रस्त्यावर उतरून लढावे. या लढ्याचे रणशिंग आज (ता.२७) कृषी पणन मंडळासमोर फुंकले जात आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांनी केले.
नव्या केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळावर निदर्शने करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशभर आंदोलने करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात भारत बंद नागरिक समिती संलग्न अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीच्या वतीने ही निदर्शने झाली. यात हमाल पंचायत, छ. शिवाजी मार्केटयार्ड कामगार युनियन, तोलणार संघटना, पथारी व्यावसायिक पंचायत, शेतकरी कामगार पक्ष, लोकायत आदी संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. बाजार समितीचे प्रथम सभापती अण्णासाहेब मगर यांच्या बाजार समिती मुख्यद्वारा पुढील पुतळ्याला आंदोलकांनी सकाळी पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलक शिवनेरी रस्त्याने पदयात्रेने राज्य कृषी मंडळ येथे आले. पणन मंडळ येथे पदयात्रेचे रूपांतर सभेत झाले. डॉ. आढाव यांच्यासह समितीचे निमंत्रक नितीन पवार, वरील संघटनांचे पदाधिकारी संतोष नांगरे, गोरख मेंगडे, सागर आल्हाट, हनुमंत बहिरट आदी सहभागी झाले होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.