सातारा : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू लागल्या आहेत. जिल्ह्यातील आठ तालुक्यांत २९ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दररोज ७० खेपांद्वारे ३७ हजार ६९५ लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे. जलसंधारणाच्या कामांमुळे यावर्षी टॅंकरची संख्या कमी असल्याचे महसूल विभागाकडून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात टॅंकर मागणीचे प्रस्ताव येऊनही त्याकडे तहसील पातळीवर दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.
गेल्या दोन ते चार वर्षांत झालेल्या जलयुक्त शिवारअंतर्गत कामांमुळे जिल्ह्यातील टॅंकरग्रस्त गावेही जलस्वयंपूर्ण झाली आहेत. त्यामुळे एरव्ही दोनशे ते अडीचशे टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. पण यावर्षी मे महिन्यात आतापर्यंत केवळ २९ टॅंकर सुरू झाले आहेत.
जलयुक्त शिवार तसेच स्वंयसेवी संस्थांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे पुढील वर्षी जिल्हा टॅंकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहे. सध्या खटाव, माण, कोरेगाव व खंडाळा तालुका वगळता उर्वरित महाबळेश्वर, पाटण, वाई, जावळी तालुक्यात झालेल्या पावसाचे पाणी अडविले नसल्याने डोंगर उतारावर असलेल्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथे टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.
त्यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील दोन, वाई तालुक्यातील तीन, पाटण तालुक्यातील दोन तर जावळी तालुक्यातील आठ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यात पाणीटंचाईची सर्वाधिक झळ माण तालुक्याला बसत आहे. या तालुक्यात १२ गावे व ६४ वाड्यावस्त्यांवर आठ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
पाणी संरक्षित करण्यासाठी १५ विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये माण तालुक्यातील चार, खटाव तालुक्यातील एक, वाई तालुक्यातील एक, जावली तालुक्यातील पाच, महाबळेश्वरमधील चार विहिरींचा समावेश आहे. जलसंधारणांच्या कामांमुळे यावर्षी टॅंकरची संख्या कमी असली तरी उष्णतेत वाढ झाल्याने पाणीटंचाईत वाढ होऊ लागली आहे.
यामुळे अनेक गावांकडून टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव येत आहेत. मात्र जलसंधारणाच्या कामांचा परिणाम दिसावा यासाठी तहसील पातळीवर या प्रस्तावांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे. तालुकानिहाय टॅंकरची संख्या ः माण ८, खटाव ३, कोरेगाव ४, खंडाळा १, वाई ३, पाटण २, जावली ७, महाबळेश्वर १.