कमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या गावांत टॅंकरने पाणीपुरवठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून गावे पाणीदार करण्याचे शासन स्वप्न पाहत आहे. मात्र यंदाच्या गंभीर दुष्काळाचा फटका जलयुक्त शिवार अभियानात निवडलेल्या गावांना बसला आहे. जलयुक्त शिवार अभियानाची कामे झालेल्या जिल्ह्यातील तब्बल १८० गावांत सध्या टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत जवळपास चारशे कोटी रुपये खर्च करून जलयुक्त शिवार अभियानाची कामे केली आहे.

राज्यात बहुतांश भागात साधारण गेल्या दहा वर्षांपासून कमीजास्त प्रमाणात दुष्काळाच्या झळा बसत आहेत. केवळ सिंचनाचा अभाव असल्याने दुष्काळी भागाला टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. शेतीलाही याचा मोठा फटका बसत असून शेतकरी कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढत आहेत. मधले दोन वर्ष चांगले गेले असले तरी यंदा दुष्काळी तीव्रता अधिक आहे. नगर जिल्ह्यात तर यंदा डिसेंबरपर्यंत म्हणजे अजून वीस दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक असल्याचे प्रशासन सांगत आहे.

चार वर्षांपूर्वी शासनाने सिंचनाची कामे करणाऱ्या विविध योजनांचा ताळमेळ घालत ‘जलयुक्त शिवार अभियान‘ सुरू करून त्यातून कामे सुरू केली. आधीच्या काळात टॅंकरने पाणीपुरवठा करणाऱ्या गावांची यात निवड करण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे अगदी सुरवातीला दुष्काळी भागातील गावांत कामे करण्याला प्राधान्य दिले. जिल्ह्यामध्ये पहिल्या वर्षी २७९, दुसऱ्या वर्षी २६४, तिसऱ्या दिवशी २४१, यंदा २४९ अशा जवळपास १०३३ गावांची निवड केली. आतापर्यंत जवळपास ३० हजारांवर कामे पूर्ण केली गेली. त्यावर चारशे कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च केली असल्याचे प्रशासन सांगत आहेत.

जलयुक्त शिवार अभियानातून कामे केल्यामुळे पाणी पातळी वाढल्याचा दावा सातत्याने केला जात आहे. मात्र यंदाच्या दुष्काळाचा फटका जलयुक्त शिवार अभियानातून कामे केलेल्या गावांना बसला आहे. सध्या जिल्ह्यामध्ये २५० गावांत टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यातील तब्बल १८० गावांत जलयुक्त शिवार अभियानाची कामे केली असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून टॅंकरची संख्या वाढत आहे. त्यामुळे ‘जलयुक्त’ची कामे झाली असली तरी पाऊस नसल्याने पाणी साठवण झाली नाही, पाणी पातळी वाढली नाही, त्यामुळे ‘जलयुक्त’ मधून कामे करून कोट्यवधी रुपये खर्च केले असले तरी यंदा बहुतांश गावांत टॅंकरनेच पाणी द्यावे लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

जलयुक्तची कामे झालेली व  सध्या टॅंकरने पाणी दिले जात असलेली गावे : श्रीगोंदा ः ५, शेवगाव ः १६, कर्जत ः ११, जामखेड ः ९, संगमनेर ः १८, कोपरगाव ः ३, राहुरी ः २, नगर ः ११, पारनेर ः २८, पाथर्डी ः ८०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com