नाशिक जिल्ह्यात टँकरने गाठली पासष्टी

नाशिक जिल्ह्यात टँकरने गाठली पासष्टी
नाशिक जिल्ह्यात टँकरने गाठली पासष्टी

नाशिक : ऑक्टोबरअखेर जिल्ह्यात टंचाईच्या झळा अधिक तीव्र झाल्या असून, सहा तालुक्यांमधील २६१ गावे व वाड्यांना ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरसाठीचे तीन नवीन प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत. त्यामुळे टँकरची एकूण संख्या ६८ वर पोचणार आहे.

नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवली. पंधरापैकी दहा तालुक्यांमध्ये सरासरीच्या केवळ ५० टक्के पाऊस झाला असून, यातील आठ तालुक्यांमध्ये सरकारने यापूर्वीच टंचाईसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. दरम्यान, दिवसेंदिवस विविध तालुक्यांमधील भूजल पातळीत घट होत आहे. परिणामी, टंचाईत भर पडत आहे. सद्यःस्थितीत पाच तालुक्यांमधील ५८ गावे आणि २०३ वाड्या-वस्त्यांना ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक १७ टँकर एकट्या सिन्नर तालुक्यात सुरू आहेत. ११ गावे आणि ९३ वाड्या-वस्त्यांना हे टँकर पाणीपुरवठा करीत आहेत. येवल्यातील ४२ गावे-वाड्यांना १५ टँकरद्वारे पाणी दिले जात आहे.

टंचाईची दाहकता विचारात घेता टँकरच्या १७८ फेऱ्या प्रशासनाने मंजूर केल्या असून, प्रत्यक्षात १६२ फेऱ्या दिवसाला होत आहेत. तसेच एकूण २६ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. यातील १९ विहिरी गावांसाठी, तर उर्वरित सात विहिरी या टँकरसाठी राखीव आहेत.

जिल्हा प्रशासनाकडे टँकरसाठीचे तीन प्रस्ताव नव्याने सादर झाले आहेत. यामध्ये मालेगाव, चांदवड आणि बागलाण तालुक्यांकडून प्रत्येकी एक प्रस्ताव आले आहेत. दरम्यान, प्रशासनाने हे प्रस्ताव जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठविल्याने टँकरची संख्या ६८ वर पोचणार आहे. दरम्यान, आगामी महिन्यात या संख्येत अधिक वाढ होण्याची चिन्हे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com