संवादासाठी तंत्रज्ञान महोत्सव फायदेशीर : बसवराज बिराजदार

Technology Festival for Communication Beneficial: Basavaraj Birajdar
Technology Festival for Communication Beneficial: Basavaraj Birajdar

सोलापूर : ‘‘शेतीतील नवे ज्ञान, तंत्रज्ञान, बदल शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यातील संवाद वाढणे आवश्‍यक आहे, अशा तंत्रज्ञान महोत्सवातून हा संवाद अधिक व्यापक आणि फायदेशीर ठरतो,’’ असे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी मंगळवारी (ता. २१) येथे व्यक्त केले. 

कृषी विज्ञान केंद्रामध्ये आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्‌घाटन बिराजदार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी शबरी कृषी प्रतिष्ठानचे  अध्यक्ष प्रदीप गायकवाड हे होते. परभणीतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय, विभागीय कृषि संशोधक केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विजय अमृतसागर, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सी. बी. दैवज्ञ, संस्थेच्या विश्‍वस्त ऊर्मिलादेवी गायकवाड, विश्‍वस्त वैशाली गलांडे, अखिल भारतीय सीताफळ संघाचे अध्यक्ष नवनाथ कसपटे, प्रगतिशील शेतकरी राजाभाऊ देशमुख, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे आदी उपस्थित होते.

बिराजदार म्हणाले, ‘‘परदेशातील शेती आणि आपल्याकडील शेतीतील अंतर कमी करण्याची गरज आहे. त्यासाठी पारंपरिक आणि आधुनिक शेती पद्धतीची जोड देऊन प्रयोग करण्याची गरज आहे. नफा-तोटा हा भाग गौण आहे. पण नवीन प्रयोग, नवीन तंत्रज्ञान आपण आत्मसात केल्याशिवाय शेतीची प्रगती होणार नाही. प्रात्यक्षिकावर आधारित तंत्रज्ञान प्रत्यक्षात पाहिल्यावर ज्ञानात भर पडते.’’ 

डॉ. मार्कंडेय म्हणाले, ‘‘शेतीला दूध व्यवसाय हा पूरक नव्हे, तर मुख्य व्यवसाय म्हणून केला पाहिजे. समृद्ध शेतीसाठी गाय महत्त्वाची आहे. ती आपल्याला, वासराला दूध देते, शेतीतल्या प्रयोगासाठी शेण, गोमूत्र देते. त्यामुळे गाईचे महत्त्व ओळखा आणि तिचे संगोपन करा.’’ गायकवाड यांनी कृषी विज्ञान केंद्राला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. शेतकऱ्यांच्या पाठबळावरच ही संस्था आज नावारूपाला आली आहे, हे विसरून चालणार नाही, असे सांगितले. 

शेतकऱ्यांचा सन्मान

केंद्रातील कर्मचारी, अधिकाऱ्यांसोबत विविध प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचा खास सन्मान झाला. त्यात नवनाथ कसपटे, राजेंद्र देशमुख, अनिता माळगे, धनाजी शेळके, विश्‍वनाथ चोरमुले, दीपक घायतिडक, ज्ञानदेव गायकवाड, उमेश देशमुख, काशिनाथ गुडगुंडे, पद्माकर भोसले, हिराजीराव शेळके, ज्ञानदेव नागणे, सोमनाथ साळुंखे, महादेवी राजमाने, प्रमोदिनी कोळी, इंदुमती उंबरे, लक्ष्मी बिराजदार, मायादेवी निकाळजे, विजयसिंह नाईकनवरे, गुलाब आवारे, परमेश्‍वर कुंभार, शिवराज कोटगी यांचा समावेश होता.

शिवारफेरीतून प्रात्यक्षिकाचा अनुभव

कृषी विज्ञान केंद्राच्या खेड येथील परिसरात यंदा ज्वारी, गहू, हरभरा या धान्य पिकांसह विविध प्रकारचे घासगवत, टोमॅटो, वांगी, हिरवी मिरची, झेंडू आदी फळभाज्या आणि फुलांचे विविध प्रात्यक्षिके या वेळी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पाहता आली. त्या-त्या पिकांची वैशिष्ट्यांसह माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com