पीकविमा परतावा न मिळाल्याने दहा गावांचा लोकसभा मतदानावर बहिष्कार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी  ः २०१७ च्या खरीप हंगामातील सोयाबीनसह अन्य पिकांच्या नुकसानीबद्दल पीकविमा परतावा न मिळाल्यामुळे पाथरी, मानवत, सेलू तालुक्यांतील एकूण १० गावांनी लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकला आहे. या संदर्भात ग्रामस्थांतर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदने देण्यात आली आहेत.

दरम्यान, प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार कानसूर (ता. पाथरी) येथील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणूक मतदानावरील बहिष्कार मागे घेतला असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. जिल्ह्यातील कानसूर, अंधापुरी, लोणी बु., बाभळगाव, डाकुपिंपरी, वाघाळा, लिंबा, आनंदनगर, गुंज (खु.) (सर्व ता. पाथरी) वलंगवाडी (ता. सेलू), मानोली (ता. मानवत) या गावांच्या ग्रामस्थांनी २०१७ मधील खरीप पीकविमा परताव्याची रक्कम न मिळाल्याच्या व इतर कारणावरून लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनास निवेदनाद्वारे दिली होती.

त्यामुळे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या-त्या मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय पाटील, तालुका कृषी अधिकारी व्ही. टी. शिंदे आदी संबंधित विभागाचे अधिकारी यांनी गावात जाऊन शेतकरी तसेच ग्रामस्थांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या मागण्याविषयी सविस्तर चर्चा केली. मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.  या संदर्भात सर्व प्रशासकीय अधिकारी त्यांच्या संपर्कात राहून मतदानासाठी प्रोत्साहित करीत आहेत. कानसूर येथील ग्रामस्थांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेतला आहे. अन्य गावांचा बहिष्कार मागे घेण्याबाबत ग्रामस्थांशी चर्चा सुरू आहे.

मानोलीचे सरपंच, ग्रामस्थ मतदान करणार  मानोली (ता. मानवत) येथील सरपंच ज्ञानोबा शिंदे आणि सर्जेराव रंगनाथराव मांडे यांनी जवळपास ३०० ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन देऊन सर्व मतदार मतदान करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांना भेटून दिली. श्री. शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे, की मानोली येथील ८ ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि ग्रामस्थ हे परभणी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. आमच्या गावातील काही ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्यासाठी अर्ज केला असून तो त्यांच्या काही राजकीय स्वार्थापोटी वैयक्तिक लाभासाठी केला असेल तरी त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. गावात विकास निधी येऊन विकासकामे झाली असून ती पूर्णही झाली आहेत.

काही मंडळी विकासास अडसर ठरू पाहत आहेत. मात्र, आम्ही लोकसभेसाठी मतदानास तयार असून मतदानाची टक्केवारी वाढण्यास भर देऊ असा विश्वास सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या निवेदनावर सुमारे ३०० ग्रामस्थांच्या प्रातिनिधीक स्वाक्षऱ्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com