मराठवाड्यात सव्वाआठ लाख लोकांची तहान टॅंकरवर

विभागात सव्वाआठ लाख लोकांची तहान टॅंकरवर
विभागात सव्वाआठ लाख लोकांची तहान टॅंकरवर

औरंगाबाद : मराठवाड्यात सर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा औरंगाबाद जिल्ह्याला बसणे सुरू झाले आहे. जिल्ह्यातील जवळपास ६ लाख ५३ हजार १६७ लोकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. सर्वाधिक १०९ टॅंकर गंगापूर तालुक्‍यात सुरू असून, जालना, बीड, उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यांतही पाणीटंचाईच्या झळा कमी अधिक प्रमाणात बसणे सुरू झाले आहे. संपूर्ण औरंगाबाद विभागात ३७९ गाव, वाड्यांमधील जवळपास ८ लाख १६ हजार १७९ लोकांची तहान टॅंकरने भागविण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

पावसाने आपली कृपादृष्टी न ठेवल्याने मराठवाड्यावर भीषण दुष्काळाचे संकट ओढावताना दिसते आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद पाठोपाठ, जालना, बीड, उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यांत ऑक्‍टोबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा बसणे सुरू झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात तर काही गावांमध्ये पावसाळ्यातही टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती.

औरंगाबाद जिल्ह्यातील ३१४ गाव व ११ वाड्यांमधील ६ लाख ५३ हजार १६७ लोकांना सद्यःस्थितीत भीषण जलसंकटाला सामोर जावे लागत आहे. पाणीटंचाईचे निवारण करण्यासाठी प्रशासनाने ३९७ टॅंकरची सोय केली आहे. यामध्ये ३ शासकीय, तर ३९४ खासगी टॅंकरचा समावेश आहे. सर्वाधिक १०९ टॅंकर गंगापूर तालुक्‍यात सुरू असून, या तालुक्‍यातील ९७ गावांमधील १ लाख ७७ हजार २२० लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गंगापूर पाठोपाठ वैजापूर तालुक्‍यातील ६६ गावे व ३ वाड्यांमधील १ लाख ०३ हजार ४८९ लोकांची तहान भागविण्यासाठी ९० टॅंकरची सोय करण्यात आली आहे.

पैठण तालुक्‍यातील ५६ गावांमधील १ लाख १८ हजार ५३८ लोकांनाही टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी ६१ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. सिल्लोड तालुक्‍यातील ३९ गाव व एका वाडीमधील १ लाख ३० हजार ७०१ लोकांची तहान भागविण्यासाठी ७३ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. खुलताबाद, कन्नड व फुलंब्री तालुक्‍यांतील प्रत्येकी दहा गावांची तहान भागविण्यासाठी अनुक्रमे ९, ८ व ६ टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. औरंगाबाद तालुक्‍यातील २६ गावे व ९ वाड्यांमधील ६४ हजार २९० लोकांची तहान भागविण्यासाठी ३६ टॅंकर सुरू करण्यात आले आहेत.

जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफ्राबाद, परतूर, अंबड, भोकरदन शहर, घनसावंगी तालुक्‍यातील ३२ गावे व २ वाड्यांमधील १ लाख १ हजार ७१० लोकांची तहान भागविण्यासाठी ६१ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, शिरूर, आष्टी, परळी वैजनाथ, पाटोदा तालुक्‍यांतील १४ गावे व १ वाडीमधील ४२ हजार ७१ लोकांची तहान भागविण्यासाठी १९ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद, कळंब, भूम, वाशी, परंडा आदी तालुक्‍यांतील ३ गावांमध्ये ३ टॅंकर सुरू करण्यात आले आहे. काही ठिकाणी विहीर अधिग्रहणातून पाणीप्रश्न निकाली काढण्याचे काम केले जात आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्‍यातील १२ हजार ६०० लोकांची तहान भागविण्यासाठी दोन टॅंकर सुरू करण्यात आले आहेत.

३६३ विहिरींचे अधिग्रहण मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यांतील ३६३ विहिरींचे टॅंकर व टॅंकरविरहित पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक २०५ तर जालना ७१, उस्मानाबाद ५८, बीड २७, नांदेड जिल्ह्यातील दोन विहिरींचा समावेश आहे. यामधील २१० विहिरी टॅंकरसाठी, तर १३३ विहिरी टॅंकर व्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित केल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com