परभणी ः परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पामधील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आला असून रविवारी (ता. २४) सकाळी आठ वाजता उणे ७.८० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. पाणीसाठ्यामध्ये दिवसागणिक झपाट्याने घट होत असल्याने या प्रकल्पावर पाणीपुरवठ्यासाठी अवलंबून असलेल्या गावात पाणी टंचाईचे येत्या काळात अधिक गडद होण्याची शक्यता आहे.
पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याव्दारे २ हजार २०० क्युसेकने तर उजव्या कालव्याव्दारे ५०० क्युसेकने आवर्तन सुरू आहे. त्यामुळे रविवारी (ता. २४) सकाळी जायकवाडी धरणामध्ये ४२.१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता. येलदरी धरणामध्ये ६१.४३ टक्के, सिद्धेश्वर धरणामध्ये ३५.०५ टक्के, माजलगाव धरणामध्ये २५.३२ टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा होता.
गतवर्षीच्या पावसाळ्यात पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस न झाल्यामुळे निम्न दुधना प्रकल्पाच्या जलाशयामध्ये जेमतेम १० ते १२ टक्के पर्यंत उपयुक्तसाठा जमा झाला होता. बेसुमार अवैध उपसा तसेच गेल्या काही दिवसांत तापमानात वाढ झाल्यामुळे उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आला आहे. धरणसाठा उणे मध्ये गेला आहे. करपरा मध्यम प्रकल्पात २१ टक्के तर मासोळी मध्यम प्रकल्पात ३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. जिल्ह्यातील २२ पैकी ११ लघु प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. जोत्याखाली पाणीसाठा गेलेल्या पैकी ६ प्रकल्प कोरडे पडले आहेत. ८ प्रकल्पांत २५ टक्के पर्यंत, १ प्रकल्पात २६ ते ५० टक्के २ प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के पर्यंत उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.