...तर ‘त्या’ नेत्यास एकरभर जमीन बक्षीस देणार

रक्त सांडून एकरकमी एफआरपी बाबतीत रस्त्यावरची लढाई करून यशस्वी लढा देईल, त्या राजकीय व्यक्तीला स्वतःची एक एकर बागायती जमीन बक्षीस देण्याची घोषणा नांदणी (ता. शिरोळ) येथील रामगोंडा पाटील या शेतकऱ्याने केली आहे.
... then ‘that’ leader will be rewarded with an acre of land
... then ‘that’ leader will be rewarded with an acre of land

कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारकडून एकरकमी एफआरपीची रक्कम तीन टप्प्यांत देण्याचा घाट घातला आहे, या विरोधात जो राजकारणी रक्त सांडून एकरकमी एफआरपी बाबतीत रस्त्यावरची लढाई करून यशस्वी लढा देईल, त्या राजकीय व्यक्तीला स्वतःची एक एकर बागायती जमीन बक्षीस देण्याची घोषणा नांदणी (ता. शिरोळ) येथील रामगोंडा पाटील या शेतकऱ्याने केली आहे. 

श्री. पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हेच गेल्या काही वर्षांपासून रस्त्यावरची लढाई करत आहेत. पण इतर राज्यकर्त्यांकडून भ्रमनिरासच होत असल्याने अखेर श्री. पाटील यांनी इतर राज्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आव्हान दिले आहे.

रामगोंडा पाटील हे नांदणी (ता. शिरोळ) भागात प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांची एकूण १८ एकर जमीन आहे. जमीन पूर्ण बागायती आहे. त्यांच्याकडे ऊस फ्लॉवरची शेती असते. ते गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राहिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून एक रकमी एफआरपी देण्याबाबतची चर्चा ऊस पट्ट्यात सुरू आहेत. या विरोधात आंदोलनाची वज्रमूठ बांधण्याचे काम शेतकरी संघटनांकडून होत आहे. पण या धोरणाच्या विरोधात कोणताही राजकारणी व्यक्ती बोलायला अथवा आंदोलन करण्यासाठी तयार नाही, यामुळे ऊस उत्पादकांत प्रचंड नाराजी आहे. ऊस उत्पादकांच्या हक्काच्या दराला कात्री लागत असल्याने अर्थकारण कोलमडण्याची दाट शक्यता आहे. ही बाब कोणीच गांभीर्याने घेत नसल्याने श्री. पाटील यांनी उद्विग्नतेतून सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे. 

या घोषणेनंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला. श्री. शेट्टी यांच्या व्यतिरिक्त कोणीही नेता या प्रश्‍नी रस्त्यावर उतरायला तयार नाही. धोरणकर्त्यांमध्ये कोणी वाली आहे की नाही हाच प्रश्‍न आम्हाला निर्माण झाला आहे. त्यामुळेच अत्यंत विचारपूर्वक मी ही घोषणा केली असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

 शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटणे महत्त्वाचे ः श्री. पाटील राज्यात २८८ आमदार आणि ४८ खासदार आहेत. त्यांना माझे हे आव्हान आहे. श्री. शेट्टी यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणतेही लोकप्रतिनिधी माझे आव्हान स्वीकारू शकतात, असेही श्री. पाटील यांनी या वेळी सांगितले. भले राजकीय लोकांसाठी एक एकर जमीन काहीच नसेल, पण आमच्यासाठी ही कष्टाची काळी आई आहे.  जमीन गेली तरी चालेल पण शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटणे महत्त्वाचे असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com