मुंबई (प्रतिनिधी) : वीज ग्राहकांना वाढीव वीजबिलातून कोणताही दिलासा मिळणार नसल्याची स्पष्टोक्ती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी केली. त्यामुळे वाढीव वीजबिलाने हैराण असलेल्या ग्राहकांना कोणताही दिलासा मिळणार नाही, मीटर रीडिंगप्रमाणे आलेली देयके ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. कोरोना प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात वीज ग्राहकांना भरमसाट वीजबिल आले. या वाढीव वीजबिलावरून विरोधी पक्षाने आवाज उठवला होता. त्या वेळी सरकारच्या वतीने राऊत यांनी जनतेला वाढीव वीजबिलातून सवलत देणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन दिवसांपूर्वीच महावितरणने वीजबिल वसुलीचे आदेश काढले आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना ऊर्जामंत्र्यांनी वीज-बिलात सवलत देण्यास असमर्थता दर्शवली. नितीन राऊत म्हणाले, ‘‘वीज वापरणारे हे जसे ग्राहक आहेत तसेच महावितरणही ग्राहक आहे. महावितरणला वीज बाहेरून विकत घ्यावी लागते. विविध शुल्कही द्यावे लागते. बिलाचे हप्ते पाडून देण्यात आले आहेत. तसेच पूर्ण बिल एकदम भरणाऱ्यांना सवलतही देण्यात आली आहे. ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून मी पूर्ण प्रयत्न केले. मात्र केंद्र सरकारने मदत केली नाही. ६९ टक्के वीज बिल वसुली पूर्ण झाली आहे. त्यामुळे सवलत देण्याचा विषय बंद झाला आहे. महावितरण ६९ हजार कोटी रुपये तोट्यात आहे. आता आम्ही कर्ज काढू शकत नाही.’’ दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाढीव वीज बिलांच्या संदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर दिवाळीच्या आधी वीजबिलात सवलत देण्याचे संकेत नितीन राऊत यांनी दिले होते. मात्र आता वीज बिलात कोणतीही सवलत देऊ शकत नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.