घरात शेतीमाल येण्यासारखा मोठा आनंद नाही!

दिवाळीचे पर्व सुरू झाल्याने शहरी भागात घरांची रंगरंगोटी, दिव्यांचा झगमगाट सुरू झाला. ग्रामीण भागात शेतकरी शेतीमाल घरात आणण्याच्या कामात व्यस्त आहे. कुठे सोयाबीनची मळणी, तर कुठे कापसाची वेचणी सुरू असल्याचे दिसते. शेतकऱ्यास घरात शेतीमाल येणे याशिवाय दुसरा मोठा आनंद नसतो..!
There is no greater joy than having farm produce at home!
There is no greater joy than having farm produce at home!

अकोला : दिवाळीचे पर्व सुरू झाल्याने शहरी भागात घरांची रंगरंगोटी, दिव्यांचा झगमगाट सुरू झाला. ग्रामीण भागात शेतकरी शेतीमाल घरात आणण्याच्या कामात व्यस्त आहे. कुठे सोयाबीनची मळणी, तर कुठे कापसाची वेचणी सुरू असल्याचे दिसते. शेतकऱ्यास घरात शेतीमाल येणे याशिवाय दुसरा मोठा आनंद नसतो..! 

विदर्भ-मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांचे सोयाबीन हेच मुख्य पीक. एकीकडे सोयाबीन काढणीचा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. तर दुसरीकडे दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकऱ्यांच्या घरात चिंता आहे. आधीच पावसाने खरीप हंगामाची वाट लावली. जेथे सोयाबीन एकरी १० ते १२ क्विंटल व्हायला हवे होते, त्याच शेतात ५० टक्के उत्पादकता घटली. पावसातून वाचलेले पीक आता घरात आले, तर बाजारात सोयाबीनला दर कमी मिळत आहे. यातून उत्पादन खर्चही भागविण्याची अडचण निर्माण झालेली आहे. दुसरे महत्त्वाचे पीक असलेल्या कापसाचेही उत्पादन यंदा सरासरी ३० ते ४० टक्के कमी आहे. दराबाबत मात्र कापूस उत्पादक थोडा समाधानी आहे. चांगल्या दरांमुळे किमान नुकसान तरी भरून निघेल, एवढा त्याला दिलासा आहे. 

शेतकरी दिवाळीपेक्षाही पीक घरी आणण्याच्या, रब्बी हंगामाच्या तयारीत व्यस्त आहे. खरिपाचे पदरात टाकलेली निराशा दिवाळीच्या काळोखात झाकोळली जावी आणि रब्बीने नवी ऊर्जा द्यावी, अशी अपेक्षा बळिराजा बाळगून पुढे निघालेला आहे. शाश्‍वत उत्पादकता मिळवण्यात नाव निर्माण करणारे शेतकरी गणेश नानोटे (रा. निंभारा, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) म्हणाले, ‘कापसाला चांगला दर असल्याने उत्पादक खूष आहे. तर सोयाबीनला दर नसल्याने हा शेतकरी सरकारच्या धोरणांवर चिडलेला आहे. हंगामाच्या तोंडावर सोयापेंड आयात करून भारतीय शेतकऱ्यांच्या पायांवर धोंडा मारण्यात आला. सोयाबीनचे उत्पादन अवघे पाच ते सात क्विंटलपर्यंत येत आहे.’

दिवाळी चार दिवसांवर आली, पण यापेक्षा शेतशिवारात कामांची धांदल सुरू आहे. घरात माल येणे हीच आम्हा शेतकऱ्यांसाठी खरे तर दिवाळी असते. त्यामुळे प्रत्येक जण शिवारातील शेतीमाल आणण्याच्या कामात, रब्बी पिकांसाठी शेत तयार करण्यात मग्न आहेत. पहाटेपासूनच शेतांमध्ये कापूस वेचणीसाठी मजूर येत आहे. मजुरीतून दोन पैसे मिळवून खेड्यातील शेतमजूर दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत आहे.

नंदकुमार चव्हाण (बोर्डी, ता. मालेगाव, जि. वाशीम) म्हणाले, ‘‘अतिवृष्टीने आमच्या भागात प्रचंड नुकसान झाले. अद्याप कुठलीही मदत मिळालेली नाही. मध्यंतरी पीकविम्याचे फॉर्म भरून नेले. साडेचार एकरात यंदा ३० पोते सोयाबीन पिकले. पण भाव नसल्याने मोठा फटका बसला आहे. ही परिस्थिती आपल्या हातात नाही. आम्ही मागील आठवणी  विसरून आता पुढील आठ-दहा दिवसांत रब्बीत हरभरा पेरण्याच्या तयारीला लागू. सध्या जमिनीत ओल असल्याने मशागत करता येत नाही. शेतकऱ्यांची दिवाळी सांगायची तर यंदाही दरवर्षीसारखीच ती असेल. 

कारला (ता. पातूर) येथील शेतकरी ज्ञानेश्‍वर तायडे म्हणाले, ‘‘आगामी काळात कांदा लागवड करीत आहे. यासाठी कांद्याची रोपे बनविणार आहे. शेत तयार करून बियाची पेरणी केली. सोयाबीनला पावसाचा मोठा फटका बसला. शासनाकडून अतिवृष्टीची मदत कालच खात्यात जमा झाल्याने दिवाळी थोडी सुकर होणार आहे. पीकविम्याचा मात्र अद्याप एक रुपया ही आलेला नाही.’’

  वसुबारस जिव्हाळ्याची... आज माझ्या शेतीत गायीचे पालन खूप महत्त्वाचा घटक बनलेले आहे. त्यामुळे सहा ते सात देशी गायींचे पालन पोषण करीत आहे. गायीपासून मिळणारे शेण, गोमूत्राचा वापर पिकांसाठी करतो. याचे खूप मोठे फायदे आमच्या शेतीत होत आहेत. उत्पादन खर्चात बचत करण्यास मदत झाली. या माध्यमातून देशी गोधनाचे संवर्धन करण्याचेही समाधान लाभत आहे. वसू बारसेला आम्ही गायींचे पूजन करून नैवेद्य खाऊ घालतो. नवीन पिढीत याविषयी फारशी माहिती नसल्याचे दुर्दैव आहे, असे देऊळगावराजा येथील शेतकरी कैलास बंगाळे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com