थोडेफार भातपीक उभे होते, पण लोंबीच नाही...

थोडेफार भातपीक उभे होते, पण लोंबीच नाही...
थोडेफार भातपीक उभे होते, पण लोंबीच नाही...

सिंधुदुर्ग : पीक म्हणून भातकापणी करण्यासारखे काही शिल्लक राहिलेले नाही. पीक उभे होते; पण त्याला लोंबीच नाही. एखादी लोंबी असली तर कापतानाच गळून पडतेय; पण पीक तसेच शेतात उभे राहू नये म्हणून कापणी केली. वर्षभराची आमची पुंजीच आमच्याच डोळ्यांसमोर मातीमोल होताना आम्हाला पाहावे लागत आहे. आता ‘खायचे काय आणि जगायचे कसे’ असा प्रश्‍न आमच्या कुटुंबासमोर आहे, अशी व्यथा गोठोस (ता. कुडाळ) येथील ज्येष्ठ महिला शेतकरी जयश्री कृष्णा नाईक यांनी कापणीचे काम करीत करीत व्यक्त केली.

जयश्री नाईक यांचे वय ६५ वर्षे आहे. त्या अजूनही शेतात काम करतात. त्यांच्या कुटुंबात वयोवृद्ध पती, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. भातशेती आणि मोलमजुरीवरच कुटुंबाची गुजराण होते. कुटुंबातील कुणीही नोकरीला नाही. खरीप हंगामातील भातशेती त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. नाईक कुटुंबीयांनी चार महिने कष्ट करून साडेतीन एकरांत भातशेती केली होती. त्यांची सर्व शेती पाणथळ जमिनीत आहे. या जमिनीत सतत पाणी असते. या वर्षी सतत पाऊस पडून पूरस्थिती निर्माण झाली. मात्र या कुटुंबीयांनी पाण्याच्या निचरा करून पूरस्थितीतही भातशेती वाचविली. कष्टाला फळदेखील चांगले आहे. नाईकांच्या भाताला चांगल्या प्रकारची लोंबीदेखील आली. 

महिनाभरापूर्वी ही सर्व शेती परिपक्व स्थितीत आली. भात कापणी अत्यंत गरजेची होती. मात्र सतत पाऊस पडत असल्यामुळे कापणी करता येत नव्हती. पाऊस कमी होईल अशा आशेवर हे कुटुंब होते. त्यातच क्यार वादळामुळे जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. जोरदार वारेदेखील वाहू लागले. नाईक यांचे हातातोंडाशी आलेले पीक तीन-चार दिवसांत जमीनदोस्त झाले. निम्म्याहून अधिक पिकांच्या लोंब्या चिखलात रुतल्या, तर उर्वरित निम्मे पीक उभे आहे; परंतु त्यावरील लोंबीच वारा आणि पावसाच्या माऱ्यामुळे गळून पडली आहे. एखादी लोंबी असली, तरी ती कापणी करतानाच गळून पडत आहे. शेतात उभे पीक ठेवू नये म्हणून या कुटुंबाने भातकापणी केली.

कापणी करता करताच जयश्री म्हणाल्या, ‘‘इतकी वर्षे झाली मात्र असा पाऊस कधी पाहिला नाही आणि इतके शेतीचे नुकसानदेखील कधी झाले नाही. गेली ३५-४० वर्षे शेती करतेय; पण अशी वेळ आमच्यावर कधीही आली नाही. आता कापणी करतोय हे फक्त मळ्यात भात उभा ठेवण्याची पद्धत नाही म्हणूनच, नाहीतर हा कापणीचा वेळदेखील वायाच जात आहे. गुरांना वैरणदेखील मिळणार नाही याची कल्पना आम्हाला आहे. खरंतर वर्षभराची पुंजीच पावसाने हिरावून घेतली आहे. आता आम्ही खायचे काय आणि जगायचे कसे, हा प्रश्‍न आमच्यासमोर आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com